कसोटी मालिकेतील पराभवामुळे महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वगुणांवर टीका झाली, पण इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेत विजय मिळवून धोनीने भारताचा सर्वात यशस्वी एकदिवसीय कर्णधार असल्याचे सिद्ध करून दाखवले. कसोटी मालिकेतील पराभवामुळे पसरलेले धुके आता ओसरले आहे, अशा शब्दांत धोनीने मालिका विजयाचे कौतुक केले. ‘‘जेव्हा मी भारतीय संघाचे नेतृत्व स्वीकारले, त्या वेळचा संघ अप्रतिम होता. आताचा संघही अप्रतिम आहे. कारकिर्दीत चढउतार येतच राहतात. ज्यांच्याबरोबर मला खेळण्याची संधी मिळाली, त्यांचा मी आभारी आहे. त्यांच्या योगदानाशिवाय भारतीय संघाचे यश अशक्य होते,’’ असे धोनीने सांगितले.