सौरव गांगुलीने बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सुत्र हाती घेतल्यानंतर, संघटनेत बदलांचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. गेली काही वर्ष दिवस-रात्र कसोटी सामन्यांना विरोध करणारं बीसीसीआय यंदा आपला पहिला दिवस-रात्र कसोटी सामना खेळणार आहे. २२ नोव्हेंबरला कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर हा सामना रंगणार आहे. त्याआधी भारतीय संघाच्या निवड समिती प्रमुखपदी माजी दिग्गज खेळाडू दिलीप वेंगसरकर यांची पुन्हा एकदा वर्णी लागण्याची शक्यता आहे. मुंबई मिरर वृत्तपत्राने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

याआधी २००६ ते २००८ दरम्यान वेंगसरकर निवड समितीचे प्रमुख होते. वेंगसरकरांच्या कार्यकाळातच विराट कोहलीला भारतीय संघात स्थान मिळालं होतं. एम.एस.के. प्रसाद सध्या निवड समितीचे प्रमुख आहेत. मात्र लोढा समितीने दिलेल्या शिफारसींनुसार आणि सध्याच्या समितीमधील माजी खेळाडूंचा अनुभव पाहता प्रसाद यांच्या सहकाऱ्यांना पुन्हा एकदा संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्याच्या निवड समितीमधील काही सदस्यांना डच्चू दिला जाऊ शकतो.

अवश्य वाचा – अनुष्का शर्माला चहा देणं हेच यांचं काम, माजी भारतीय खेळाडूची निवड समितीवर खरमरीत टीका

प्रसाद यांच्या निवड समितीने २०१७ साली आयसीसी चॅम्पिअन्स ट्रॉफी आणि २०१९ विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड केली होती. नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात बीसीसीआयची सभा होणं अपेक्षित आहे. या सभेत नवीन निवड समितीबद्दल निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन समितीवर वेंगसरकर यांची वर्णी लागते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेऊन आरोप करणं चुकीचं – एम.एस.के. प्रसाद