करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या देशभरात आणीबाणीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. भारताच्या प्रमुख शहरांमध्ये प्रत्येक दिवशी नवीन करोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. केंद्र सरकार व इतर संबंधित यंत्रणा करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून गर्दीची ठिकाणं टाळण्याचा सल्ला दिला जात आहे. काही महत्वाच्या शहरांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. देशातील महत्वाच्या क्रीडा स्पर्धांनाही करोनाचा फटका बसला आहे. बीसीसीआयने आयपीएलसह अनेक महत्वाच्या स्थानिक स्पर्धा रद्द केल्या आहेत.

२९ मार्चपासून सुरु होणारी आयपीएल स्पर्धा आता १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आलेली आहे. अनेक संघांनी करोनाच्या धसक्यामुळे आपले ट्रेनिंग कँप रद्द केले आहेत. चेन्नई सुपरकिंग्जनेही आपला कँप रद्द केला आहे. चेन्नईचा महत्वाचा खेळाडू सुरेश रैनानेही आपल्या चाहत्यांना करोनाविषयी कोणत्याही अफवा पसरवू नका आणि योग्य ती काळजी घ्या असं आवाहन केलं आहे.

आणखी वाचा- CoronaVirus : “दुसऱ्या देशांकडून थोडं शिका’; ‘बर्थ डे गर्ल’ सायनाचा चाहत्यांना सल्ला

देशात सध्या करोनाबाधित रुग्णांचा आकडा शंभरीपार गेला आहे. महाराष्ट्रात एका रुग्णाला करोनामुळे आपले प्राणही गमवावे लागले आहेत. त्यामुळे आगामी काळात सरकारी यंत्रणा करोनावर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी ठरतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.