विंडीज आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टी-20 संघातून महेंद्रसिंह धोनीला वगळण्याचा निर्णय बीसीसीआयच्या निवड समितीने घेतला. यानंतर सोशल मीडियावर निवड समितीच्या निर्णयाबद्दल अनेक प्रतिक्रीया उमटत गेल्या. अनेकांनी धोनीचं टी-20 मधलं करिअर संपलं असेही तर्क मांडले. मात्र इंडियन एक्स्प्रेस वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, धोनीला विश्रांती देण्यात आली नसून त्याला वगळण्याचाच निर्णय घेण्यात आला आहे. निवड समितीने संघ व्यवस्थापनाद्वारे धोनीला, आता तुला पर्याय शोधण्याची वेळ आली आहे, असा स्पष्ट संदेश पाठवल्याचंही समजतं आहे.

2020 टी-20 विश्वचषकात धोनी खेळणार नसेल तर यापुढे त्याला भारताच्या टी-20 संघात जागा देण्यास काहीच अर्थ नसल्याचं मत निवड समितीच्या सदस्यांनी व्यक्त केल्याची माहिती समोर येते आहे. मात्र वन-डे क्रिकेटमध्ये धोनीने काय करावं हा निर्णय निवड समितीने धोनीवरच सोपवला आहे. निवड समितीची बैठक सुरु होण्याआधी धोनीला टी-20 क्रिकेटमध्ये आम्ही तरुण खेळाडूला संधी देणार असल्याचं कळवण्यात आलं होतं. 2020 टी-20 विश्वचषकात धोनी खेळणार नाही ही गोष्ट आता स्षष्ट आहे, त्यामुळे धोनीला पर्याय शोधण्याची हीच योग्य वेळ असल्याचं, बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितलं.

धोनीच्या वन-डे संघातील समावेशाबद्दल निवड समितीच्या सदस्यांमध्ये बऱ्याच प्रमाणात एकमत झाल्याचं कळतंय. अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विश्वचषकासाठी धोनीचा अनुभव संघासाठी गरजेचा असल्याचं मत बैठकीत व्यक्त करण्यात आलं होतं. 1 नोव्हेंबरपासून रणजी क्रिकेटचा हंगाम सुरु होतोय, त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन-डे मालिकेपर्यंत धोनीला मोठी विश्रांती मिळणार हे आता स्पष्ट झालंय.

अवश्य वाचा – धोनीला संघातून वगळण्याचा निर्णय योग्यच !