इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) या स्पर्धेचा ११ वा हंगाम नुकताच पार पडला. गेली ११ वर्षे बीसीसीआय या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करत आहे. या स्पर्धेमुळे बीसीसीआय आणि त्यातील गुंतवणूकदारांना भरपूर आर्थिक फायदा झाला आहे. परंतु, याच बीसीसीआयला आणि आयपीएलच्या काही माजी अधिकाऱ्यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) दणका दिला आहे. आयपीएलच्या २००९च्या हंगामासाठी सुमारे १२१ कोटींचा दंड ईडीकडून ठोठावण्यात आला आहे.

फेमा अॅक्टनुसार हा दंड ठोठावण्यात आला आहे. २००९ साली आयपीएलचे आयोजन दक्षिण आफ्रिकेत करण्यात आले होते. त्यावेळी चुकीच्या पद्धतीने सुमारे २४३ रक्कम भारताबाहेर ट्रान्स्फर करण्यात आल्याचा आरोप या प्रकरणी ठेवण्यात आला आहे. २००९ साली निवडणुकांमुळे सामन्यांचे आयोजन भारतात होऊ शकले नव्हते. या सामन्यांचे भारताबाहेर म्हणजेच दक्षिण आफ्रिकेत आयोजन करण्यात आले.

ईडीने या प्रकरणी बीसीसीआयला ८२ कोटी ६६ लाखांचा, मंडळाचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांना ११ कोटी ५३ लाखांचा आयपीएलचे माजी कमिशनर ललित मोदीला ९ कोटी ७२ लाखांचा, मंडळाचे माजी खजिनदार एमपी पांडव यांना ९ कोटी ७२ लाखांचा तर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विलीनीकरण करण्यात आलेल्या स्टेट बँक ऑफ त्रावणकोर बँकेला ७ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आले आहे. तसेच ४५ दिवसांच्या आत दंड भरण्याचे निर्देश दिले आहेत.