आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दिमाखदार पदार्पणानंतर शिखर धवनच्या कामगिरीत मोठय़ा प्रमाणावर घसरण झाली आहे. इंग्लंड दौऱ्यात अपेक्षेनुरूप कामगिरी करू न शकल्याने भारतीय संघाच्या कामगिरीवरही परिणाम झाला. मात्र इंग्लंडमधील अपयश बरेच काही शिकवणारे होते, असे मत शिखरने व्यक्त केले.
‘‘सहा कसोटी डावांतील अपयशी कामगिरीने आता ५० दमदार खेळींसाठी मला प्रेरणा दिली आहे. गेल्या वर्षभरात मी बऱ्याच गोष्टी शिकलो आहे. अपयशाचा सामना केल्याशिवाय यशाचे गांभीर्य कळत नाही. कामगिरी खराब होत असतानाही कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे पाठबळ हे महत्त्वाचे होते. खेळाडूची गरज काय आहे, याची धोनीला जाण आहे. प्रशिक्षक व साहाय्यकांनी या टप्प्यातून बाहेर येण्यास मला मदत केली,’’ असे तो म्हणाला.
खेळात काही बदल केले आहेस का, याविषयी विचारले असता शिखर म्हणाला, ‘‘आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव वाढतो, तशा बऱ्याच गोष्टी समजतात. माझा मूलभूत खेळ तसाच आहे. गोलंदाजाची लय बिघडवून वर्चस्व कसे गाजवायचे, याची मला जाण आहे.’’