भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धची ट्वेन्टी-२० मालिका देखील जिंकली. भारताने तिसऱया आणि निर्णायक ट्वेन्टी-२० सामन्यात इंग्लंडवर तब्बल ७५ धावांनी विजय साजरा केला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत इंग्लंडसमोर २०३ धावांचा डोंगर उभारला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव भारतीय गोलंदाजांनी १२७ धावांत गुंडाळला. भारताचा युवा फिरकीपटू युझवेंद्र चहल याने सामन्यात कमाल केली. चहलने आपल्या चार षटकात २५ धावा देऊन तब्बल सहा विकेट्स घेतल्या.

 

भारतीय संघाने सामन्यात विजयासह एक पराक्रम देखील केला. इंग्लंडच्या डावाची सुरूवात झाली होती. जेसन रॉय (३२), जो रुट (४२) आणि कर्णधार मॉर्गन (४०) यांनी चांगली फटकेबाजी केली होती. इंग्लंडच्या ११९ धावांवर दोन विकेट्स पडल्या होत्या. पण मॉर्गन आऊट झाल्यानंतर पुढच्या अवघ्या ८ धावांमध्ये इंग्लंडचा संपूर्ण संघ गारद झाला. क्रिकेटच्या इतिहासात केवळ दुसऱयांदाच असा पराक्रम केला गेला. याआधी तब्बल ७१ वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड कसोटी सामन्यात असा प्रसंग घडला होता. ऑस्ट्रेलियाने केवळ ५ धावांमध्ये न्यूझीलंडच्या ८ फलंदाजांना बाद केले होते. त्यानंतर काल इंग्लंडने भारताविरुद्धच्या सामन्यात ८ धावांत ८ विकेट्स गमावल्या.

युझवेंद्र चहलने काल सहा विकेट्स घेऊन केलेल्या अप्रतिम कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. चहलच्या फिरकीपुढे इंग्लंडच्या फलंदाजांनी अक्षरश: नांगी टाकली. इंग्लंडचा डाव १२७ धावांत गुंडाळून भारताने ७५ धावांनी विजय मिळवला. भारताने ही टी-२० मालिका जिंकली आणि इंग्लंडला तीनही फॉर्मटमध्ये व्हाइटवॉश दिला. चहलला साथ मिळाली ती जसप्रीत बुमराहची. १४ धावांच्या मोबदल्यात त्याने ३ विकेट्स घेतल्या.