पुण्याच्या गहुंजे मैदानावर आज भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना खेळवण्यात आला. यात इंग्लंडने भारताच्या 337 धावांच्या आव्हानाचा यशस्वी आणि सहज पाठलाग करत मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली.  या सामन्यात  इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतानेही बटलरच्या निर्णयाचे स्वागत करत 50 षटकात 6 बाद 336 धावा केल्या. भारताकडून केएल राहुलने शतक ठोकले. मात्र, इंग्लंडकडून जॉनी बेअरस्टो, जेसन रॉय, बेन स्टोक्स यांनी भारताच्या गोलंदाजांवर आक्रमण करत 43.3 षटकातच हे आव्हान पूर्ण केले.

इंग्लंडचा डाव

भारताच्या 337 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना जॉनी बेअरस्टो आणि जेसन रॉयने दमदार सुरुवात केली. 10 षटकात इंग्लंडने बिनबाद 59 धावा केल्या. पहिल्या सामन्याप्रमाणे या दोघांनी चमकदार खेळ करत संघाला शतकी धावसंख्येचा टप्पा ओलांडून दिला. हे दोघे भारताला डोकेदुखी ठरणार, असे वाटत असताना चायनामन फिरकीपटू कुलदीप यादवच्या षटकात रॉय धावबाद झाला. त्याने 7 चौकार आणि एका षटकारासह 55 धावांची खेळी केली. रॉय बाद झाल्यानंतर बेन स्टोक्स आणि बेअरस्टो यांनी अर्धशतकी भागीदारी रचली. 25 षटकात इंग्लंडने 1 बाद 167 धावांपर्यंत मजल मारली. संघाला दोनशेपार पोहोचवल्यानंतर बेअरस्टोने कुलदीपला षटकार खेचत आपले शतक पू्र्ण केले. बेअरस्टोच्या शतकानंतर बेन स्टोक्सने अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतकानंतर स्टोक्सने भारतीय गोलंदाजांची धुलाई करण्याल सुरुवात केली. कुलदीप यादवच्या एका षटकात स्टोक्सने सलग तीन षटकार ठोकले. स्टोक्स 99 धावांवर असताना भुवनेश्वर कुमारने त्याला झेलबाद केले. स्टोक्सने 52 चेंडूत 4 चौकार आणि 10 षटकारांची आतषबाजी केली. स्टोक्सनंतर प्रसिध कृष्णाच्या षटकात बेअरस्टोही झेल देऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने 11 चौकार आणि 7 षटकारांसह 124 धावा ठोकल्या. स्टोक्स आणि बेअरस्टो यांनी 175 धावांची भागीदारी रचली.

या दोघांनंतर फलंदाजीला उतरलेल्या बटलरचा प्रसिध कृष्णाने शून्यावर त्रिफळा उडवला. भारताने इंग्लंडला लागोपाठ तीन हादरे दिले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. लियाम लिव्हिंगस्टोन आणि डेव्हिड मलान यांनी फटकेबाजी करत इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. भारताकडून प्रसिध कृष्णाला सर्वाधिक दोन बळी मिळाले.

भारताचा डाव

नाणेफेक गमावलेल्या भारताकडून रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी सलामी दिली. मागील सामन्यात शतकाच्या जवळ पोहोचलेल्या शिखरकडून या सामन्यात चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. मात्र, तो 17 चेंडूत फक्त 4 धावा काढून बाद झाला. आज खेळण्याची संधी मिळालेल्या रीस टॉप्लेने त्याला बटलरकरवी झेलबाद केले. त्यानंतर आलेल्या विराटसोबत रोहितने जम बसवायला सुरुवात केली. मात्र, वैयक्तिक 25 धावांवर असताना तो सॅम करनच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्यानंतर विराट कोहली आणि लोकेश राहुल यांनी भारताला सांभाळले. या दोघांनी संयमी खेळी करत 23व्या षटकात भारताचे शतक पूर्ण केले.  भन्नाट फॉर्मात असलेल्या विराटने सलग चौथे एकदिवसीय अर्धशतक पूर्ण केले.  अर्धशतकाचे रुपांतर शतकात करण्यात विराटला पुन्हा अपयश आले. आदिल रशिदने त्याला वैयक्तिक 66 धावांवर तंबूत धाडले. या खेळीत त्याने 3 चौकार आणि 1 षटकार लगावला.

विराट बाद झाल्यानंतर ऋषभ पंत आणि लोकेश राहुलने संघाची धावगती वाढवली. पंतने आक्रमक फलंदाजीचा नजराणा पेश करत 28 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्यानंतर राहुलनेही  44व्या षटकात आपल्या शतकाची पायरी ओलांडली. शतक केल्यानंतर राहुलला टॉम करनने माघारी धाडले. राहुलने 7 चौकार आणि 2 षटकारांसह 108 धावा ठोकल्या. राहुलनंतर हार्दिक पंड्या आणि पंतने चौफेर फटकेबाजीला सुरुवात केली. वेगवान शतकाकडे कूच करणाऱ्या पंतला टॉम करनने बाद करत इंग्लंडला मोठे यश मिळवून दिले. पंतने 40 चेंडूत 3 चौकार आणि 7 षटकारांसह 77 धावा फटकावल्या. डावाच्या शेवटच्या षटकात हार्दिक बाद झाला. त्याने 16 चेंडूत 4 षटकार आणि एक चौकारासह 35 धावांची उपयुक्त खेळी केली. इंग्लंडकडून टॉप्ले आणि टॉम करन यांनी 2-2 तर, सॅम करन आणि आदिल रशिदने 1-1 बळी घेतला.

उभय संघातील तिसरा आणि निर्णायक एकदिवसीय सामना 28 मार्च रोजी पुण्यात खेळवला जाईल.