यश नाहर आणि अंकित बावणे यांच्या दमदार शतकी खेळीमुळे महाराष्ट्राने विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेतील अखेरच्या साखळी सामन्यात पुदुचेरीवर १३७ धावांनी मात केली. मात्र या विजयानंतरही महाराष्ट्राला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागल्याने बाद फेरीत मजल मारण्याचे त्यांचे स्वप्न अधुरे राहिले.

प्रथम फलंदाजी करताना नाहर आणि बावणे यांनी दुसऱ्या गडय़ासाठी १९२ धावांची भागीदारी रचत दमदार सुरुवात केली. नाहरने १२० चेंडूंत ९ चौकार आणि ५ षटकारांसह ११९ धावांची खेळी साकारली. त्यानंतर बावणेने ११५ चेंडूंत १० चौकार आणि १ षटकारासह ११० धावा फटकावल्या. मधल्या फळीतील राहुल त्रिपाठीने नाबाद ५९ धावांची खेळी केल्यामुळे महाराष्ट्राने ४ बाद ३३३ धावांचा डोंगर उभा केला.

हे आव्हान पार करताना मध्यमगती गोलंदाज राजवर्धन हंगरगेकर याच्या गोलंदाजीपुढे पुदुचेरीच्या फलंदाजांचा निभाव लागला नाही. ४ बाद २१ अशा अवस्थेतून त्यांना शेल्डन जॅक्सन (४५) आणि आशिथ राजीव (३०) यांनी तारले. सागर त्रिवेदीने एका बाजूने नाबाद ७९ धावा करत किल्ला लढवला. पण पुदुचेरीचा डाव ४३.२ षटकांत १९६ धावांवर संपुष्टात आला. महाराष्ट्राकडून राजवर्धनने चार तर सत्यजीत बच्छाव व केदार जाधवने प्रत्येकी दोन बळी मिळवले.