दक्षिण आफ्रिकेत पार पडलेल्या १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत बांगलादेशच्या संघाने भारतावर मात करत आपलं पहिलं विजेतेपद पटकावलं. मात्र सामन्यानंतर दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये झालेल्या हमरीतुमरीमुळे बांगलादेशच्या विजयाला वेगळ वळण मिळालं. सामन्यात बाजी मारल्यानंतर बांगलादेशच्या सर्व खेळाडूंनी मैदानात येऊन जल्लोषाला सुरुवात केली. यादरम्यान बांगलादेशच्या संघातील एका राखीव खेळाडूने भारतीय खेळाडूकडे पाहत काही आक्षेपार्ह वक्तव्य केलं…यावर भारतीय खेळाडूंनीही बांगलादेशी खेळाडूला प्रत्युत्तर दिलं. ज्यामुळे काहीकाळ मैदानात दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये जुंपलेली पहायला मिळाली. दोन्ही पंचांनी वेळेत हस्तक्षेप केल्यामुळे हा वाद फारसा लांबला नाही. आयसीसीनेही या घटनेची दखल घेतली असून व्हिडीओ फुटेज तपासल्यानंतर योग्य कारवाई केली जाणार असल्याचं आश्वासक सामनाधिकाऱ्यांकडून देण्यात आलेलं आहे.
“मैदानात नेमकं काय घडलं आम्हाला खरंच कळलं नाही. आम्हा सर्वांना धक्का बसला होता. आयसीसीचे अधिकारी त्या घटनेचं व्हिडीओ फुटेज पाहून पुढील कारवाईबद्दल निर्णय घेणार आहेत. सामनाधिकाऱ्यांनी माझ्याकडे येऊन घडलेल्या प्रकाराबद्दल माफी मागितली. आयसीसी याविरोधात कडक कारवाई करेलं असंही आश्वासन मला मिळालेलं आहे.” भारतीय संघाचे व्यवस्थापक अनिल पटेल यांनी Espncricinfo संकेतस्थळाशी बोलताना सांगितलं.
अवश्य वाचा – Video : संघाच्या विजयाला बांगलादेशी खेळाडूंनी लावलं गालबोट, भर मैदानात हमरीतुमरी
भारतीय कर्णधार प्रियम गर्गने या प्रकारासाठी बांगलादेशला दोषी ठरवलं आहे. “आम्ही शांत होतो. हार-जीत हा खेळाचा एक भाग आहे, कधीतरी तुम्ही जिंकता तर कधीतरी तुम्ही हरता…मात्र बांगलादेशी खेळाडूंचं सेलिब्रेशन किळसवाणं होतं. हा प्रकार व्हायला नको होता, पण आता सगळं ठीक आहे.”
अवश्य वाचा – U-19 World Cup : बांगलादेशी खेळाडूंचं सेलिब्रेशन किळसवाणं होतं, भारतीय कर्णधाराची प्रतिक्रिया
दरम्यान बांगलादेशचा कर्णधार अकबर अलीने सामन्यानंतर या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. “मैदानात जे काही घडलं ते दुर्दैवी होतं…नेमकं काय झालं हे मला माहिती नाही. पण अंतिम सामन्यात खेळाडू भावनेच्या भरात असं कृत्य करुन बसतात. क्रिकेटमध्ये असे प्रकार घडायला नकोत, खेळाप्रती सर्वांना आदर असायलाच हवा. क्रिकेट हा सभ्य माणसांचा खेळ म्हणून ओळखला जातो. कर्णधार या नात्याने मी संघाकडून माफी मागतो.”
अवश्य वाचा – U-19 World Cup Final : बांगलादेशी गोलंदाजाचा रावडी थ्रो, दिव्यांश सक्सेना थोडक्यात बचावला
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 10, 2020 12:50 pm