इंग्लंड दौऱ्यात कसोटी मालिकेत ४-१ ने पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर भारतीय निवड समितीने याची गंभीर दखल घेतली आहे. जर खेळाडूंना योग्य संधी देऊनही त्यांच्याकडून मनासारखी कामगिरी होत नसेल तर आम्ही तरुण खेळाडूंचा विचार करु अशा इशाराच, निवड समितीचे प्रमुख एम. एस. के. प्रसाद यांनी दिला आहे. ते टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलत होते.

टीम इंडियात कर्णधार विराट कोहलीचा अपवाद वगळता एकही फलंदाज मनासारखी कामगिरी करु शकला नाहीये. अखेरच्या कसोटीत लोकेश राहुल आणि ऋषभ पंत यांनी शतकं झळकावून भारताची पत राखली. मात्र पुरेशा संधी देऊनही काही भारतीय खेळाडूंची कामगिरी सुधारत नाहीये, त्यामुळे भविष्यात आम्ही तरुण खेळाडूंना संधी देऊ असं सुचक विधान प्रसाद यांनी केलं आहे. याचसोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी भारतात होणाऱ्या काही सामन्यांमध्ये आणखी काही खेळाडूंना विश्रांती दिली जाण्याची शक्यता असल्याचे संकेत प्रसाद यांनी दिलेत.

इंग्लंड दौऱ्यासाठी संघ निवड करत असतानाही आम्ही तरुण खेळाडूंऐवजी अनुभवी खेळाडूंना संधी दिली. भारताच्या सलामीवीरांकडून अपेक्षित कामगिरी झालेली नाही. पुजारा, रहाणे यांच्यासारख्या खेळाडूंकडे कसोटी क्रिकेटचा प्रचंड अनुभव आहे. इंग्लंड दौऱ्यात काही कसोटी सामन्यांमध्ये त्यांनी चांगली कामगिरी केलीही, मात्र त्यांच्याकडून आणखी चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. प्रसाद यांनी भारताच्या फलंदाजीबद्दल आपलं मत मांडलं.

बंगळुरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतून प्रत्येक खेळाडूच्या फिटनेसबद्दल निवड समिती माहिती घेत असल्याचंही प्रसाद म्हणाले. स्थानिक पातळीवरील क्रिकेट स्पर्धांमध्ये काही खेळाडू अतिशय चांगली कामगिरी करत आहेत. कर्नाटकचा मयांक अग्रवाल यंदाच्या हंगामात चांगला खेळतो आहे. याचसाठी आम्ही त्याच्या प्रशिक्षकांना त्याला संघात जास्तीत जास्त संधी देण्याची विनंती केली आहे. त्याच्या कामगिरीवर निवड समितीची नजर आहेच, योग्य वेळ येताच त्याला संघात संधी मिळेल, असंही प्रसाद म्हणाले. त्यामुळे निवड समिती प्रमुखांनी दिलेला इशारा भारतीय खेळाडू किती गांभीर्याने घेतात हे पहावं लागणार आहे.