जागतिक फुटबॉल महासंघाच्या परिषदेच्या (फिफा) झुरिच येथे मंगळवारी झालेल्या बैठकीत विश्वचषक स्पर्धेत सहभागी संघांची संख्या वाढविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेत ४८ संघ खेळविण्यात येणार आहेत. स्पर्धेत एकूण १६ गट तयार करण्यात येणार असून एकूण ८० सामने होणार आहेत. २०२६ सालच्या विश्वचषक स्पर्धेपासून हे नियम अंमलात आणले जातील. प्रत्येक संघाला जास्तीत जास्त सात सामने खेळण्याची संधी यामुळे मिळणार आहे. लवकरच ‘फिफा’कडून या संदर्भातील अधिक माहिती जाहीर केली जाणार आहे.

वाचा: विश्वविक्रमी क्लोसचा अलविदा

 

‘फिफा’ विश्वचषकात सध्या ३२ संघांचा समावेश आहे. २०१८ आणि २०२२ सालच्या विश्वचषक स्पर्धा त्यानुसारच खेळविण्यात येतील. त्यानंतर २०२६ सालच्या विश्वचषक स्पर्धेत आणखी १६ संघांची वाढ करण्यात येईल. फिफाच्या अध्यक्षांनी याबाबतचा अंतिम निर्णय घेतला आहे. दरम्यान, फिफाच्या या निर्णयावर काहींनी टीका केली आहे. स्पर्धेत अधिक संघांना समाविष्ट केल्याने स्पर्धेचे महत्त्व कमी होईल, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.

वाचा: ‘फिफा’ क्रमवारीत भारताची उत्तुंग झेप

‘फिफा’च्या क्रमवारीत भारताने सुधारणा केली असली तरी त्यामुळे विश्वचषक स्पर्धेचे तिकीट काही आपल्याला मिळू शकत नाही. भारतीय संघ फिफा क्रमवारीत १७३ व्या स्थानी होती. त्यानंतर भारतीय संघाचे प्रशिक्षक कॉन्स्टनटाईन यांनी मेहनत घेऊन संघाला १३७ व्या स्थान प्राप्त करून दिले होते.

वाचा: सुनील छेत्रीचे नेतृत्व प्रेरणादायी