फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत यजमान भारतीय संघाचं आव्हान आता जवळपास संपुष्टात आलेलं आहे. पहिल्या सामन्यात अमेरिकेच्या संघाकडून ३-० ने हार पत्करावी लागल्यानंतर, दुसऱ्या सामन्यात कोलंबियानेही भारताचा २-१ ने पराभव केला. पहिल्या सामन्याच्या तुलनेत भारताने कोलंबियाला कडवी टक्कर दिली. अखेरच्या क्षणात भारताने स्पर्धेतला आपला पहिला गोल करत बरोबरीही साधली होती, मात्र बचावफळीतील खेळाडूंनी दाखवलेल्या हलगर्जीपणामुळे कोलंबियाने सामन्यात दुसरा गोल झळकावत स्पर्धेतलं आपलं आव्हान कायम राखलं.

पहिल्या सत्रात भारतीय संघाने कोलंबियाच्या संघाला चांगलच झुंजवलं. पहिल्या सत्रात दोन्ही संघाना गोल करता आला नाही. कोलंबियाच्या खेळाडूंनी केलेलं आक्रमण भारताचा गोलकिपर धीरज सिंहने मोठ्या शिताफीने परतवून लावलं. पहिल्या सत्रात कोलंबियाच्या संघाला एकही गोल करु न देण्यात धीरज सिंहचा मोठा वाटा होता. त्याने कोलंबियाच्या खेळाडूंनी मारलेले सुरेख फटके गोलपोस्टमध्ये जाण्यापासून रोखले. पहिल्या सत्रात भारतीय खेळाडूंनीही कोलंबियावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचे सर्व प्रयत्न हे फोल ठरले.

अवश्य वाचा – U-17 World Cup Football – दोन महिन्यांपूर्वी काय घडलं होतं भारत विरुद्ध कोलंबिया सामन्यात?

मात्र दुसऱ्या सत्रात परिस्थिती लगेच बदलली. कोलंबियाच्या खेळाडूंनी आपल्या आक्रमणात आणखी धार आणत ४८ व्य़ा मिनीटाला आपला पहिला गोल झळकावला. ज्युआन पेनालोझाने पहिला गोल झळकावत कोलंबियाला आघाडी मिळवून दिली. कोलंबियाच्या या आक्रमणामुळे भारतीय संघ काहीसा बॅकफूटवर गेलेला पहायला मिळाला. यानंतर भारतीय संघाने कोल्हापूरचा खेळाडू अनिकेत जाधवला संघात जागा दिली. मात्र भारतीय खेळाडूंना गोल करण्यात यश येत नव्हतं. अखेर ८२ व्या मिनीटाला जॅक्सन सिंहने ही कोंडी फोडत हेडरवर सुरेख गोल झळकावत सामन्यात बरोबरी साधली. हा भारताचा विश्वचषक स्पर्धेतला पहिला गोल ठरला.

मात्र यानंतर अवघ्या एका मिनीटाच्या आत भारतीयांच्या आनंदावर विरझण पडलं. पहिल्या गोलनंतर जल्लोषात रमलेल्या भारतीय खेळाडूंचा फायदा उचलत कोलंबियाच्या खेळाडूंनी भारतीय गोलपोस्टवर आक्रमण केलं. ८३ व्या मिनीटाला ज्युआन पेनालोझाने सामन्यात आणखी एक गोल झळकावत कोलंबियाला पुन्हा एकदा आघाडी मिळवून दिली. कोलंबियाच्या या गोलदरम्यान भारताच्या बचावफळीचा एकही खेळाडू आपल्या जागेवर हजर नव्हता. याचा फायदा उचलत कोलंबियाने पुन्हा एकदा सामन्यावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं.

लागोपाठ दोन सामन्यांमध्ये पराभव स्विकारावा लागल्यामुळे या स्पर्धेत पुढच्या फेरीत प्रवेश मिळवण्याच्या भारताच्या मनसुब्यांवर पाणी फिरलं आहे. साखळी फेरीत भारत आपला शेवटचा सामना घानाविरुद्ध १२ ऑक्टोबरला खेळणार आहे. त्यामुळे आपला शेवटचा सामना जिंकून भारत या स्पर्धेचा शेवट गोड करतो का हे पहावं लागणार आहे.

अवश्य वाचा – Live FIFA World Cup – अमेरिकेचा सलग दुसरा विजय, घानावर १-० ने मात