भारतात सध्या करोनाने रौद्ररुप धारण केले आहे. त्यामुळे अनेक विदेशी क्रिकेटपटू त्यांच्या मायदेशी जाण्याच्या विचारात आहेत. आयपीएलमध्ये खेळणारे तीन क्रिकेटपटू लीगच्या मध्यातच त्यांच्या देशात परतले आहेत. शिवाय, ऑस्ट्रेलियन सरकारनेही आयपीएलशी संबंधित ऑस्ट्रेलियन खेळाडूंना मायदेशी परतण्यासाठी स्वतःची व्यवस्था करावी लागेल, असे सांगितले होते. या सर्व प्रकरणामुळे मनस्ताप सहन कराव्या लागलेल्या आयपीएलमधील एका ऑस्ट्रेलियन समालोचकाने थेट त्यांच्या पंतप्रधानांनाच प्रश्न विचारला आहे.

ऑस्ट्रेलियन सरकारने भारतातून येणारी विमाने १५ मेपर्यंत रद्द केली आहेत. त्यामुळे लीगमधील खेळणाऱ्या खेळाडूंना आणि समालोचकांना परतीचा मार्ग बंद झाला आहे. या निर्णयावरून ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक मायकेल स्लेटर यांनी ट्वीटद्वारे पंतप्रधानांना खडे बोल सुनावले आहेत.

स्लेटर आपल्या ट्विटमध्ये म्हणाले, ”जर सरकारने ऑस्ट्रेलियन लोकांच्या सुरक्षेची काळजी घेतली, तर ते आम्हाला घरी येऊ देतील. ही एक लाजिरवाणी गोष्ट आहे. पंतप्रधान तुमच्या हाताला रक्त लागले आहे, आमच्याशी असे वागण्याची तुमची हिंमत कशी झाली? आपण क्वारंटाइन सिस्टिमविषयी काय बोलाल? मी सरकारकडून आयपीएलमध्ये काम करण्याची परवानगी घेतली होती, पण आता सरकार आमच्याकडे दुर्लक्ष करीत आहे.”

 

कोलकाता-बंगळुरू सामना स्थगित

आयपीएल २०२१स्पर्धेत आज कोलकाता नाइटराइडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सामना रंगणार होता. मात्र या सामन्यापूर्वी दोन खेळाडूंना करोनाची लागण झाल्याने सामना पुढे ढकलण्यात आला आहे. करोनामुळे खेळाडूंच्या गोटात भीतीचे वातावरण पसरले आहे. आयपीएल स्पर्धा करोनाच्या सावटाखाली होत असल्याने खेळाडू बायो बबलमध्ये खेळत आहेत. तसेच कडक नियमावली लागू करण्यात आली. अशात खेळाडूंना करोनाची लागण होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. आता कोलकाता संघातील वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरीयर या दोन खेळाडूंना करोनाची लागण झाली आहे.