चेन्नई : भारताचे माजी सलामीवीर व्हीबी चंद्रशेखर यांचे गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्यामुळे वयाच्या ५७व्या वर्षी निधन झाले. क्रिकेटवर्तुळात ‘व्हीबी’ या नावाने परिचित असलेल्या चंद्रशेखर यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा त्यांचा परिवार आहे. आक्रमक फलंदाज असलेल्या चंद्रशेखर यांनी सात एकदिवसीय सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले. त्याचबरोबर १९८८मध्ये तामिळनाडूला रणजी करंडकाचे विजेतेपद मिळवून देण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती. नंतर प्रशिक्षणाकडे आणि समालोचनाकडे वळलेल्या चंद्रशेखर यांनी बराच काळ राष्ट्रीय निवड समितीचे सदस्य म्हणूनही काम पाहिले आहे. इंडियन प्रीमियर लीग क्रिकेटमध्ये पहिली तीन वर्षे त्यांनी चेन्नई सुपर किंग्सच्या व्यवस्थापकाची भूमिका निभावली होती.