वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना उद्यापासून रंगणार आहे. या सामन्यासाठी आजी-माजी सर्वच खेळाडू उत्सुक आहे. त्यामुळे प्रत्येक जण आपआपल्या बाजूने टीम इंडियाचं विश्लेषण करत आहेत. कोणते ११ खेळाडू संघात असायला हवे आणि कुणाला आराम द्यायचा याबाबत माजी खेळाडू सूचना देत आहेत. उद्या विराट कोहली कोणता संघ मैदानात घेऊन उतरेल यावरच पुढची गणितं आणि विश्लेषण अवलंबून असणार आहे. माजी क्रिकेटपटू इरफान पठाण आणि व्यंकटेश प्रसाद  यांनी संभाव्य ११ खेळाडूंची नावं जाहीर केली आहे. तर सुनिल गावस्कर यांनी एक सल्ला दिला आहे.

इरफान पठाणनं जाहीर केलेल्या संभाव्य ११ खेळाडूंच्या यादीत रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत, आर. अश्विन, मोहम्मद शमी, इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांचा समावेश आहे. मोहम्मद सिराज ऐवजी अनुभवी इशांत शर्माला संघात स्थान दिल्याचं त्याने स्पष्ट केलं आहे. इरफाने आपल्या संघात रविंद्र जडेजाला स्थान दिलं नाही. मात्र दिलगिरी व्यक्त करत पूर्णवेळ फलंदाज म्हणून हनुमा विहारी योग्य असल्याचं मत व्यक्त केलं आहे. हा संघ योग्य आहे का? याबाबत त्याने नेटकऱ्यांना प्रश्नही विचारला आहे.

माजी क्रिकेटपटू व्यंकटेश प्रसाद यानेही अंतिम सामन्यासाठी संघ जाहीर केला आहे. या संघात रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, रविंद्र जडेजा, आर. अश्विन, मोहम्मद शमी, इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांना स्थान दिलं आहे. या खेळाडूंना घेऊन सामना खेळल्यास नक्कीच जिंकू, असा विश्वासही व्यंकटेश प्रसाद याने व्यक्त केला आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन या दोघांनाही भारताने खेळवावे, अशी सूचना महान माजी सलामीवीर फलंदाज सुनील गावस्कर यांनी केली आहे. ‘‘अश्विन-जडेजा गोलंदाजीच्या माऱ्याचा जसा समतोल राखतात, तसाच फलंदाजीचा भारही भक्कमपणे सांभाळतात. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या लढतीनंतर होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत बरेच काही हवामान आणि खेळपट्टी यावर अवलंबून असेल,’’ असे गावस्कर यांनी सांगितले.