स्थानिक क्रिकेटमध्ये दादा संघ म्हणून ओळख असलेल्या मुंबई संघाला २०१९-२० रणजी हंगामात पहिल्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. घरच्या मैदानावर रेल्वे संघाने मुंबईवर १० गडी राखून मात करत ७ गुणांची कमाई केली. महत्वाची गोष्ट म्हणजे, अवघ्या ३ दिवसांत हा सामना संपल्यामुळे मुंबईच्या या मानहानीकारक पराभवाची सर्वत्र चर्चा होताना दिसते आहे.

अवश्य वाचा – रणजीतही रेल्वेमुळे मुंबईची दैना ; १० गडय़ांनी पराभवाची नामुष्की

मुंबईच्या या खराब कामगिरीवर संघाचा माजी खेळाडू आणि आपल्या काळात रणजी क्रिकेट स्पर्धा गाजवणारा विनोद कांबळी चांगलाच नाराज झाला आहे. रेल्वेविरुद्धच्या सामन्यातील संघनिवडीवर टीका करत, विनोदने पारंपरिक मुंबईकर भाषेत…मस्त डब्बा घातला असं म्हणत आपली नाराजी व्यक्त केली.

काय म्हणाला विनोद कांबळी??

मुंबईने मस्त डब्बा घातला! अत्यंत खराब कामगिरी. आंतरराष्ट्रीय सामना ४-५ दिवसांवर आला असताना श्रेयस अय्यर आणि शिवम दुबे यासारख्या खेळाडूंना संघात जागा का मिळाली नाही हे समजलं नाही. अद्याप मुंबईचा सर्वोत्तम संघ मैदानात खेळण्याची मला आशा आहे.

काय घडलं रेल्वेविरुद्धच्या सामन्यात?

वानखेडे स्टेडियमवर तीन दिवसांत संपलेल्या या ब-गटातील सामन्यात रेल्वेने पहिल्याच दिवशी सामन्यावर वर्चस्व प्रस्थापित करताना मुंबईचा पहिला डाव ११४ धावांवर गुंडाळला. मग कर्णधार कर्ण शर्माच्या (नाबाद ११२) झुंजार शतकाच्या बळावर बडोद्याने पहिल्या डावात १५२ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर वेगवान गोलंदाज हिमांशू सांगवानपुढे (६० धावांत ५ बळी) मुंबईचा दुसरा डाव १९८ धावांत गडगडला. विजयासाठी ४७ धावांचे तुटपुंजे आव्हान रेल्वेने १२व्या षटकातच साधले. सलामीवीर मृणाल देवधर (नाबाद २७) आणि प्रथम सिंग (नाबाद १९) यांनी रेल्वेला १० गडी राखून विजय मिळवून देत एका बोनस गुणाची भरसुद्धा घातली.

४१ वेळा रणजी विजेत्या मुंबईने ३ बाद ६४ धावसंख्येवरून आपल्या दुसऱ्या डावाला प्रारंभ केला. खेळपट्टीवर ठाण मांडत दोन पूर्ण दिवस खेळून काढल्यास किमान सामना अनिर्णीत राखता येईल, हेच त्यांचे ध्येय होते; परंतु खेळपट्टीवर नांगर टाकण्यात माहीर असलेला कसोटीपटू अजिंक्य रहाणेने दुसऱ्या डावातही निराशा केली. गुरुवारी तीन धावांवर नाबाद असलेल्या रहाणेने पाच धावांची भर घातली आणि ८ धावांवर तो तंबूत परतला. ६३ कसोटी सामन्यांचा अनुभव गाठीशी असलेला रहाणे सांगवानच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक नितीन भिलेकडे झेल देऊन बाद झाला आणि मुंबईची स्थिती ४ बाद ६९ अशी झाली.

मग कर्णधार सूर्यकुमार यादव (९४ चेंडूंत १२ चौकारांसह ६५ धावा) आणि अनुभवी आदित्य तरे (४७ चेंडूंत १४ धावा) यांनी पाचव्या गडय़ासाठी ६४ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. रेल्वेच्या गोलंदाजांना झगडायला लावण्याच्या इराद्याने सूर्यकुमारने आपल्या नैसर्गिक आक्रमक खेळाऐवजी संयमी फटक्यांना प्राधान्य दिले. परंतु पहिल्या डावात सहा बळी घेणारा वेगवान गोलंदाज टी. प्रदीपने तरेला बाद करून ही जोडी फोडली. हा झेलसुद्धा यष्टीरक्षक भिलेनेच घेतला.

तरे तंबूत परतल्यानंतर रेल्वेच्या गोलंदाजांनी सूर्यकुमार आणि शाम्स मुलानी (१) यांना झटपट बाद करीत मुंबईची अवस्था ७ बाद १३५ अशी केली. परंतु शार्दूल ठाकूर (३१ चेंडूंत २१ धावा) आणि आकाश पारकर (७५ चेंडूंत ५ चौकारांसह नाबाद ३५) यांनी आठव्या गडय़ासाठी २९ धावांची भागीदारी करून मुंबईचा डावाने पराभव टाळला.

लेग-स्पिनर कर्णने पारकरला बाद केले. तेव्हा पंचांनी तो नोबॉल ठरवल्याने त्याला जीवदान मिळाले. उपहाराआधी शार्दूल कर्णच्या गोलंदाजी स्लिपमध्ये मृणालकडे झेल देऊन बाद झाला आणि मुंबईची स्थिती ८ बाद १६४ अशी झाली. मग पारकरने तळाच्या फलंदाजांच्या साथीने रेल्वेपुढे किमान ४७ धावांचे आव्हान ठेवले.

अवश्य वाचा – अजिंक्य रहाणे म्हणतोय, मी प्रचंड आशावादी ! जाणून घ्या कारण…