कोणत्याही गोष्टींमध्ये परिवर्तन होणं गरजेचं असतं असं म्हणलं जातं, मग क्रीडा आणि त्यातल्या त्यात क्रिकेट यात कसं बरं मागे राहुन चालेल?. आयसीसीच्या विशेष क्रिकेट समितीने सध्याच्या काही नियमांमध्ये सुधारणा करुन नवीन नियम लागू करण्याची शिफारस केली होती. या नवीन नियमांना आयसीसीचे सीईओ डेव्हिड रिचर्डसन यांच्या अध्यक्षतेखालील समितीने काही महिन्यांपूर्वीच मान्यता दिली आहे. त्यामुळे १ ऑक्टोबर २०१७ पासून खेळवल्या जाणाऱ्या प्रत्येक सामन्यात आयसीसीने घालून दिलेले 'हे' नवीन नियम लागू होणार आहेत. १ ऑक्टोबर २०१७ पासून लागू होणारे आयसीसीचे नवीन नियम - १) एखाद्या खेळाडूने पंचांकडे फलंदाज पायचीत ( LBW ) असल्याचं अपील केलं, आणि पंचांनी फलंदाजाला नाबाद ठरवल्यानंतर निर्णयाविरुद्ध रिव्ह्यू घेताना जर, अंपायर्स कॉल असा निर्णय आला तरीही 'तो' संघ आपली ( DRS ) ची संधी गमावणार नाहीये. याआधीच्या नियमांप्रमाणे तिसऱ्या पंचांनी अंपायर्स कॉल असा निर्णय दिल्यावर संघाची ( DRS ) ची संधी संपून जायची. २) कसोटी सामन्यांत यापुढे एका डावात ८० षटकांनंतर DRS च्या दोन नवीन संधी मिळणार नाहीत. याआधी प्रत्येक संघाला ८० व्या षटकांनंतर दोन नवीन संधी मिळायच्या. ३) वन-डे आणि कसोटी सामन्याप्रमाणे टी-२० सामन्यातही DRS चा वापर करण्यात येणार आहे. ४) नवीन नियमांनूसार DRS मध्ये BALL TRACKING आणि EDGE DETECTION TECHNOLOGY या सुविधा असणं अनिवार्य होणार आहे. ५) आयसीसीच्या नवीन नियमांनूसार प्रत्येक फलंदाजाच्या बॅटची रुंदी ही १०८ मिमि, खोली ६७ मिमि तर बॅटची कडा ही ४० मिमि इतकी असणं बंधनकारक असणार आहे. ६) फुटबॉलच्या सामन्याप्रमाणे यापुढे कोणत्याही खेळाडूने मैदानात पंचांशी गैरवर्तन किंवा हुज्जत घातल्यास पंचांना त्यांना रेड कार्ड दाखवून मैदानाबाहेर काढण्याचा अधिकार आहे. ७) १ ऑक्टोबरपासून लागू करण्यात आलेल्या नवीन नियमांनूसार एखाद्या फलंदाजाची बॅट क्रिजमध्ये पोहचल्यानंतर जर हवेत उचलली गेली तरीही त्याला धावबाद ( RUN OUT ) ठरवता येणार नाहीये. मात्र स्टम्प्स उडत असताना फलंदाजाची बॅट क्रिजमध्ये नसेल तर तो बाद ठरवला जाणार आहे.