भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली हा अनेक युवा क्रिकेटपटूंसाठी आदर्श आहे. अनेकांना वाटतं की कर्णधार असावा तर असा. पण याच भारताच्या माजी कर्णधाराबद्दल स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने एक धक्कादायक विधान केले आहे. गांगुली कर्णधार असताना ड्रेसिंग रूममध्ये आल्यावर तो आम्हाला जे सांगायचा, ते आम्हाला ऐकावंच लागायचं, असे सेहवाग म्हणाला.

एका कार्यक्रमात बोलताना सेहवाग म्हणाला की सौरव गांगुली संघाचा कर्णधार असताना मी, युवराज सिंग आम्ही सगळे अगदीच नवीन आणि युवा क्रिकेटपटू होतो. तो आम्हाला त्याची किट बॅग आवरून ठेवायला सांगायचा आणि तो निघून जायचा. आमचा तो कर्णधार असल्यामुळे आम्हीदेखील तो सांगेल, ते निमूटपणे ऐकायचो. त्याचं म्हणणं ऐकण्यावाचून आम्हाला दुसरा पर्यायच नसायचा, असेही सेहवाग म्हणाला.

याबाबत अधिक बोलताना सेहवाग म्हणाला की गांगुली एक अनुभवी खेळाडू आणि यशस्वी कर्णधार होता. आम्ही बरेचसे सामने त्याच्या नेतृत्वात जिंकले. सामना संपल्यावर पोस्ट-मॅच मुलाखतीसाठी किंवा पत्रकार परिषदेसाठी त्याला जावे लागत असे. अशा वेळी तो मला, युवराज सिंगला आणि इतर काही नव्या खेळाडूंना त्याची किट बॅग आवरायला आणि सामान भरून ठेवायला सांगत असे. आम्ही अगदी नवे चेहरे होतो. त्यामुळे आम्हाला त्याचं ऐकावंच लागायचं, असा खुलासा सेहवागने केला.

या कार्यक्रमाला सौरव गांगुलीही उपस्थित होता. सेहवागने त्याच्यावर आरोप केल्यानंतर गांगुली स्वतःही हसू लागला. आणि नंतर त्याने याबाबत मत व्यक्त केले. ‘या नव्या लोकांपैकी कोणीही माझी किट बॅग स्वतःहून भरत नव्हतं. या सगळ्यांना सामना संपल्यावर पळून जायला आवडायचं. एवढंच त्यांचं माझी किट बॅग भरण्यात योगदान होतं, असं गांगुली म्हणाला.