यशोशिखर गाठण्याचा प्रवास नेहमीच अवघड असतो. मुंबई क्रिकेटमधील प्रतिष्ठेच्या गाइल्ड शिल्ड (१४ वर्षांखालील) क्रिकेट स्पर्धेचे जेतेपद यंदा कुल्र्यातील अल बरकत मलिक मोहम्मेडन इस्लाम (इंग्रजी माध्यम) संघाने पटकावले. या जेतेपदात निर्णायक भूमिका बजावणाऱ्या अल बरकतच्या शिलेदारांनी दररोज तीन तास प्रवासाचे शिवधनुष्य पेलत संघाचा विजयी प्रवास सुकर केला. वांद्रे-कुर्ला संकुलातील शरद पवार अकादमी मैदानावर गुरुवारी विजयाची औपचारिकता पूर्ण केल्यानंतर अल बरकतच्या खेळाडूंनी जेतेपदापर्यंतच्या प्रवासाचा टप्पा उलगडला.

छोटय़ा चणीचा हर्ष मोगावीरा अल बरकतचा कर्णधार. जेमतेम तीन फूट उंचीचा आणि आठवीत शिकणारा हर्ष एकटय़ाने लोकलने थेट खारघरहून कुर्ला गाठतो. २४ तास आणि ७ दिवस ओसंडून गर्दी वाहणाऱ्या कुर्ला स्थानकातून तो १५ मिनिटांची पायी वारी करत शाळेत दाखल होतो. सात तासांच्या शाळेनंतर थोडी विश्रांती असते. त्यानंतर हर्ष आपल्या सहकाऱ्यांसह शाळेच्या मैदानात जोरदार सराव करतो. दोन तासांच्या सरावानंतर हर्ष गच्च भरलेल्या लोकलमधून पुन्हा खारघरला रवाना होतो. जाणे-येणे मिळून हर्षचे साधारण अडीच तास प्रवासात जातात. दिवसभराचे व्यस्त वेळापत्रकाचे पालन केल्यानंतर हर्ष रात्रीचे भोजन करतो आणि निद्रादेवीच्या अधीन होतो.

‘‘साधारण दीड वर्ष रोज सकाळी मोटारसायकलवरून हर्षला शाळेत सोडायचो. यामध्ये दोन तास जायचे. माझे नोकरीचे ठिकाण बेलापूर असल्याने दोन्ही गोष्टी सांभाळताना माझी तारांबळ उडायची. हर्षला एकटय़ाने रेल्वेने पाठवण्याचा निर्णय धाडसाने घेतला. गर्दीमुळे आजही भीती वाटते. शाळेत सुखरूप पोहचल्यानंतर तो कळवतो, मगच जीव भांडय़ात पडतो,’’ असे हर्षच्या वडिलांनी सांगितले. खारघरमधील शाळेतच हर्षला का पाठवत नाहीत, अशी विचारणा अनेकांकडून होते. याबाबत हर्षच्या वडिलांनी सांगितले की, ‘‘अल बरकत शाळेचा क्रिकेटसाठीचा उपक्रम सर्वसमावेशक आहे. अभ्यासाकडे दुर्लक्ष न होता खेळासाठीच्या सोयीसुविधा उपलब्ध होत असल्याने जाण्यायेण्याचा त्रास पत्करतो.’’

आपल्या भेदक गोलंदाजीसह अल बरकतच्या विजयात मोलाची भूमिका बजावणारा अनुराग सिंगही दोन वर्षे ‘खारघर-कुर्ला-खारघर’ प्रवास करत असे. मात्र क्रिकेटसाठीची ऊर्जा प्रवासात वाया जाऊ नये, यासाठी त्याच्या पालकांनी कुल्र्याला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला.

पश्चिम रेल्वे मार्गावर असणाऱ्या मीरा रोडहून येणाऱ्या सौमिल मालणकर आणि यश प्रसाद यांचा दिवस पहाटे साडेचारला सुरू होतो. साडेपाचची लोकल पकडून सांताक्रूझमार्गे ते कुल्र्यातील शाळेत पोहोचतात. यश आपल्या दैनंदिन वाटचालीबाबत म्हणाला, ‘‘गर्दी खूप असते, मात्र डब्यातले सहप्रवासी मदत करतात. पावसाळ्यात उशीरही होतो. मात्र क्रिकेटसाठी शाळेकडून पुरेपूर पाठिंबा आणि मार्गदर्शनासाठी प्रशिक्षकांचा ताफा असल्याने प्रवासाचा त्रास होत नाही. घरी जाताना लोकलची गर्दी वाढते. म्हणून आम्ही दादरमार्गे जातो. क्रिकेटची किटबॅग शाळेतच ठेवण्याची मुभा असल्याने प्रवास सोपा होतो.’’

‘‘खेळातले बारकावे शिकता येतात. स्पर्धा, सराव याचा अभ्यासावर परिणाम होऊ नये पुनर्परीक्षा घेण्यात येते. अतिरिक्त तासिका घेण्यात येतात. अशा वातावरणामुळे प्रवासाच्या अंतराचा त्रास जाणवतच नाही,’’ असे बोरिवलीहून शाळेत येणाऱ्या कुणाल देसाईने सांगितले. तर  पनवेलजवळच्या कामोठेहून कुल्र्याला येणाऱ्या जीवनदीप कार्लेकरच्या वडिलांनी सांगितले की, ‘‘आमचे औषधांचे दुकान आहे. वय लहान असल्याने जीवनदीपला ने-आण करण्याची जबाबदारी मी पाहतो. या काळात दुकानाची जबाबदारी त्याची आई सांभाळते.’’

क्रिकेटसाठी चार प्रशिक्षक असणारी अल बरकत एकमेव शाळा आहे. क्रिकेट खेळणाऱ्या विद्यार्थ्यांना शुल्क माफ आहे. क्रिकेट साहित्य शाळेकडून पुरवण्यात येते. ही संरचना लक्षात आल्याने लांब अंतरावरुनही मुलांना पाठवण्यास पालक तयार होत आहेत.  नफीस खान, मुख्य प्रशिक्षक

 

संक्षिप्त धावफलक

  • आयईएस व्हीएन सुळे गुरुजी संघ : ८६ आणि ६९ (अनुराग सिंग ५/२०) पराभूत विरुद्ध अल बरकत एमएमआय इंग्रजी माध्यम संघ : २७६ (अंकित यादव ८८, हिमांशू सिंग ७९; अथर्व भोसले ७/९६)
  • सर्वोत्तम फलंदाज : वेदप्रकाश जैस्वाल (व्हीएन सुळे गुरुजी संघ)
  • सर्वोत्तम गोलंदाज : अथर्व भोसले (व्हीएन सुळे गुरुजी संघ)