दिल्लीवर १३९ धावांनी विजय; पार्थिवचे शतक 

पार्थिव पटेलने कर्णधारपदाला साजेसे केलेले शतक, जसप्रीत बुमराह व रुद्रप्रताप सिंग यांची प्रभावी गोलंदाजी या कामगिरीच्या जोरावर गुजरातने पहिल्यांदा विजय हजारे चषक उंचावला. गुजरातने अंतिम फेरीत दिल्लीवर १३९ धावांनी विजय मिळवला.

गुजरातने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत २७३ धावा केल्या. गुजरातने पहिले दोन गडी अवघ्या ४४ धावांत गमावले. मात्र त्यानंतर पार्थिव व रुजूल भट्ट यांनी तिसऱ्या विकेटसाठी १४९ धावांची भागीदारी रचली. पार्थिवने ११९ चेंडूंत १० चौकारांच्या जोरावर १०५ धावांची खेळी साकारली. रुजूलने चार चौकार व एक षटकारासह ६० धावा केल्या. दिल्लीकडील अनुभवी फलंदाजांची फळी पाहता २७४ धावांचे लक्ष्य अवघड नव्हते, मात्र रुद्रप्रतापने अचूक टप्प्यावर मारा करत चार बळी मिळवत त्यांच्या फलंदाजीचा कणाच मोडला. बुमराहने पाच फलंदाजांना बाद करत संघाला विजेतेपद मिळवून दिले.

संक्षिप्त धावफलक

गुजरात : ५० षटकांत सर्वबाद २७३ (पार्थिव पटेल १०५, रुजूल भट्ट ६०; सुबोध भाटी २/४३, पवन नेगी २/३६) वि. वि. दिल्ली : ३२.३ षटकांत सर्व बाद १३४ (उन्मुक्त चंद ३३, पवन नेगी ५७, जसप्रीत बुमराह ५/२८, रुद्रप्रताप सिंग ४/४२). सामनावीर : पार्थिव पटेल आणि रुद्रप्रताप सिंग.