बेंगळूरु : टेनिसच्या ग्रँड स्लॅम स्पर्धाचे दुहेरी प्रकारातील सामने पाहायला सहसा कुणी जात नाहीत. भारतात मात्र दुहेरीच्याच चर्चा अधिक रंगत आहेत. एकेरीकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज आहे, असे मत भारताचे माजी टेनिसपटू विजय अमृतराज यांनी व्यक्त केले.

टेनिसमधील अमृतराज यांच्या योगदानाबद्दल भारतीय क्रीडा पत्रकार महासंघातर्फे (एसजेएफआय) एका शानदार कार्यक्रमात माजी क्रिकेटपटू गुंडप्पा विश्वनाथ यांच्या हस्ते त्यांना एसजेएफआय सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. या वेळी ते म्हणाले, ‘‘लिएण्डर पेसच्या डेव्हिस चषक टेनिस स्पध्रेतील पुनरागमनाची शक्यता कमी वाटते आहे. मात्र दुहेरीच्या चर्चा आपल्याकडे नेहमीच होत आहेत. त्याऐवजी एकेरीकडे लक्ष केंद्रित  करण्याची आवश्यकता आहे.’’

डेव्हिस चषकाच्या नव्या नियमावलीबाबत अमृतराज म्हणाले, ‘‘देशात डेव्हिस चषकाचे सामने खेळण्याला आम्ही अतिशय महत्त्व द्यायचो. मायदेशात खेळण्याचा फायदाही आपल्या संघाला मिळायचा. पंतप्रधान स्वत: लढतीची कार्यक्रमपत्रिका जाहीर करण्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहायचे. आपले सामने त्रयस्थ ठिकाणी खेळायला आपण तयार होऊ नये. २०१९ मध्ये नेमके काय होते, ते पाहणे योग्य ठरेल.’’

मी नेमबाजीत यश मिळवले, परंतु प्रसारमाध्यमांनी मला प्रसिद्ध केले, अशी प्रतिक्रिया माजी विश्वविजेती नेमबाज अंजली भागवतने व्यक्त केली. प्रसारमाध्यमांमधील योगदानाबद्दल अंजलीला एसजेएफआयचे सन्माननीय सदस्यत्व देण्यात आले.