न्यूझीलंडचा तडफदार फलंदाज रॉस टेलरने पुढील सामन्यात भारत नक्की पुनरागमन करेल असे म्हणत, पुढील सामन्याची खेळपट्टी भारतीय फलंदाजांच्या बाजूची असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे हॅमिल्टनवरील या खेळपट्टीवर भारतीय संघ चांगली कामगिरी करेल असेही रॉस टेलर म्हणाला.
न्यूझीलंड विरुद्ध सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाचा २४ धावांनी पराभव झाला होता. या सामन्यात विराट कोहलीला वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आलेली नाही.
रॉस टेलर म्हणाला, विजयी सामन्याने मालिकेची सुरूवात झाली. हे आमच्यासाठी चांगलेच आहे परंतु, यापुढे विजयी मालिका कायम राखण्याचे आमच्यासमोर आव्हान आहे. आमच्या संघातील प्रत्येक खेळाडूने आपली भूमिका योग्यरित्या बजावली. या सांघीक कामगिरीमुळे आम्ही विजयी झालो. भारताचीही बाजू मजबूत आहे. यात काही शंका नाही. पुढच्या सामन्यात ते नक्की पुनरागमन करतील याची मला खात्री आहे. हॅमिल्टन खेळपट्टीशी भारतीय खेळाड पटकन जुळवून घेतील असेही रॉस टेलर म्हणाला.