जगभरात करोनाच्या तडाख्याने हाहा:कार माजला असताना पाकिस्तानी माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी मात्र काश्मीर मुद्द्यावरून भारतीय व्यवस्था आणि पंतप्रधान मोदी यांना टीकेचे लक्ष्य केले. काश्मीरी जनतेचा त्रास समजून घेण्यासाठी कोणत्याही विशिष्ट धर्माचा असण्याची गरज नाही. काश्मीर वाचावायला हवे (#SaveKashmir) अशा आशयाचे ट्विट शाहिद आफ्रिदी याने केले. त्याचसोबत एका ठिकाणी बोलताना आफ्रिदीने, मोदी हे धर्माचे राजकारण करतात. काश्मीरमधील जनतेला आतापर्यंत दिलेल्या त्रासाबद्दल मोदींना उत्तर द्यावं लागेल, अशीही गरळ ओकली. यावरून फिरकीपटू हरभजन सिंगने आफ्रिदी आणि माझा आता काहीही संबंध नाही, असे म्हणत त्याला चांगलेच सुनावले.

“शाहिद आफ्रिदी माझ्या देशाबद्दल आणि पंतप्रधानांबद्दल जे काही बोलला, ते खूपच चुकीचं आहे. अशा गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत. आफ्रिदीच्या करोनाबाबतच्या उपक्रमाला आम्ही मदतीचे आवाहन करावे असे त्याने स्वत: आम्हाला सांगितले म्हणून आम्ही आवाहन केले होते. आम्ही माणुलकीच्या नात्याने त्याच्या उपक्रमाला मदत केली कारण तो करोनाबाधितांना सहाय्य करत होता. पंतप्रधान मोदी यांनी सांगितले होते की करोनाविरूद्धचा लढा हा धर्म, जात किंवा सीमेच्याही पलीकडचा आहे. त्यामुळे आमच्या डोक्यात स्पष्ट होते की आम्ही ही मदत करोनाबाधितांसाठी करत आहोत. पण हा माणूस आमच्याच देशाबद्दल वाईट बोलतो. आता खड्ड्यात गेला शाहिद आफ्रिदी…त्याला भारताविरोधात बोलायचा काहीही अधिकार नाही. त्याने त्याच्या देशात आणि मर्यादेत राहावं”, असे सडेतोड मत हरभजनने स्पोर्ट्स तक कार्यक्रमात व्यक्त केलं.

“२० वर्ष मी माझ्या देशाचं प्रतिनिधीत्व केलंय. मी भारतात जन्मलो आणि भारतातच अखेरचा श्वास घेईन. त्यामुळे मी माझ्या देशाविरोधात काही केलंय असं बोलायचा कोणालाही अधिकार नाही. आज असो किंवा उद्या… देशाला माझी गरज भासली, तर देशासाठी बंदूक घेऊन सीमेवर जाणारा मी पहिला असेन”, असेही हरभजन म्हणाला.