भारताचा अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंहने प्रेक्षकांविना तेराव्या हंगामाची आयपीएल स्पर्धा खेळवण्याला आपला पाठींबा दर्शवला आहे. करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर, स्पर्धा खेळवण्यास काहीच हककत नाही, कारण अनेक लोकांचा रोजगार या स्पर्धेवर अवलंबून आहे. करोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा अंदाज घेता बीसीसीआयने २९ मार्चपासून सुरु होणारी आयपीएल स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली आहे. मात्र १५ एप्रिलनंतरही स्पर्धा सुरु होईल की नाही याबद्दल बीसीसीआयने अद्याप ठोस उत्तर दिलं नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“होय, प्रेक्षक हे आयपीएलसाठी महत्वाचे आहेतच. पण अगदीच तशी परिस्थिती आल्यास त्यांच्याशिवाय आयपीएल खेळवण्यास काहीच हरकत नाही. खेळाडू म्हणून मला ते कदाचीत आवडणार नाही, पण सर्व चाहत्यांना त्यांच्या घरात बसून टिव्हीवर सामने पाहता येतील.” Star Sports वाहिनीच्या एका कार्यक्रमात हरभजन सिंह बोलत होता. आयपीएलमध्ये हरभजन सध्या चेन्नई सुपरकिंग्ज संघाचं प्रतिनिधीत्व करतो. मात्र ही स्पर्धा सुरु करण्याआधी आपल्याला अनेक गोष्टींची तयारी करावी लागणार आहे. खेळाडूंची सुरक्षा हा महत्वाचा मुद्दा असून, मैदानं ठरवणं, प्रवासासाठी विमानं, रहायचं हॉटेल हे स्वच्छ असणं गरजेचं आहे. अनेकांचं आयुष्य या स्पर्धेवर अवलंबून आहे त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर आपण ही स्पर्धा खेळवायला हवी, असं हरभजनने नमूद केलं.

दरम्यान मध्यंतरी बीसीसीआय सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्या काळात आयपीएल स्पर्धा आयोजित करण्याच्या प्रयत्नात असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र यासाठी आशिया चषक ही स्पर्धा पुढे ढकलण्यासाठी बीसीसीआयला मोठे प्रयत्न करावे लागणार आहे. सध्याच्या घडीला देशभरात महत्वाच्या शहरांमध्ये करोना बाधित रुग्ण सापडत आहेत…त्यामुळे या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यास सरकारी यंत्रणांना कधी यश येतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Harbhajan singh fine with ipl in empty stadia but hopes it happens as lives depend on it psd
First published on: 07-04-2020 at 13:21 IST