सलग दुसऱ्या सामन्यात भारतीय संघावर ५१ धावांनी मात करुन ऑस्ट्रेलियाने वन-डे मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. सिडनीच्या मैदानावर ३९० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ ३३८ धावांपर्यंतच मजल मारु शकला. भारताकडून विराट कोहली, लोकेश राहुल आणि अन्य फलंदाजांनी चांगले प्रयत्न केले. परंतू अपेक्षित धावगती कायम न राखल्यामुळे टीम इंडियाला ३९० धावांचं डोंगराएवढं आव्हान झेपवलं नाही.

अवश्य वाचा – BLOG : काहीतरी गंडलंय हे नक्की फक्त विराटने ते मान्य करायला हवं !

सलग दुसऱ्या पराभवानंतर भारतीय संघ आणि कर्णधार विराट कोहलीवर टीका होत असताना फिरकीपटू हरभजन सिंहने विराटची पाठराखण केली आहे. “विराटवर कर्णधारपदाचं दडपण आहे असं मला वाटत नाही. तो संघाचं चांगल्या पद्धतीने नेतृत्व करतो आहे. एका व्यक्तीने सामना जिंकवून देणं ही अपेक्षा करणं चुकीचं आहे. विश्वचषकानंतरही मी बोललो होतो की विराट आणि रोहितसारखे फलंदाज तुमच्या संघात चांगली कामगिरी करत आहेत. लोकेश राहुलही सध्या चांगला खेळ करतोय. परंतू याव्यतिरीक्त भारतीय संघाला सातत्याने धावा करणाऱ्या फलंदाजांनी गरज आहे. असं झाल्यास विराट आणि रोहितवरचं दडपण कमी होऊ शकतं.” हरभजन India Today ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.

अवश्य वाचा – Ind vs Aus : भारताच्या पराभवासाठी विराटने गोलंदाजांना ठरवलं जबाबदार, म्हणाला…

भारतीय संघाकडून शिखर धवन आणि मयांक अग्रवाल जोडीने चांगली सुरुवात केली. परंतू अर्धशतकी भागीदारी केल्यानंतर दोन्ही फलंदाज माघारी परतले. यानंतर कर्णधार विराट कोहली आणि श्रेयस अय्यरने महत्वपूर्ण भागीदारी करत संघाचा डाव सावरला. सुरुवातीला दोन्ही फलंदाजांनी मैदानावर स्थिरावण्याला प्राधान्य दिला. परंतू यानंतर ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी दोघांना फारसे मोठे फटके खेळण्याची संधी दिली नाही. श्रेयस अय्यरला बाद करत हेन्रिकेजने भारताची जोडी फोडली, त्याने ३८ धावा केल्या. यानंतर लोकेश राहुल आणि विराट कोहली यांची जोडी जमली. यादरम्यान विराटने आपलं अर्धशतकही पूर्ण केलं.

अवश्य वाचा – विराटची कॅप्टन्सी न समजण्यासारखी…सलग दुसऱ्या पराभवानंतर गंभीरची कोहलीवर टीका

दुसऱ्या बाजूने लोकेश राहुलही त्याला चांगली साथ देत होता. ही जोडी मैदानावर कमाल दाखवणार असं वाटत असतानाच हेजलवूडने विराटला माघारी धाडलं, त्याने ८९ धावांची खेळी केली. कोहली बाद झाल्यानंतर लोकेश राहुलनेही जबाबदारी स्विकारत पांड्याच्या जोडीने फटकेबाजीचा प्रयत्न केला. अर्धशतकी खेळी केल्यानंतर तो देखील झॅम्पाच्या गोलंदाजीवर ७६ धावा काढून बाद झाला. यानंतर पॅट कमिन्सने एकाच षटकात जाडेजा आणि पांड्याला बाद करत भारताच्या आक्रमणातली हवाच काढली. यानंतर भारताच्या अखेरच्या फळीतले फलंदाज फक्त हजेरीवीर ठरले. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने ३, जोश हेजलवूड आणि झॅम्पाने प्रत्येकी २ तर हेन्रिकेज आणि मॅक्सवेल यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.

अवश्य वाचा – निव्वळ वेडेपणा ! विराटच्या ‘त्या’ निर्णयावर माजी भारतीय गोलंदाजाची टीका