भारतीय क्रिकेट संघापासून बऱ्याच दिवसांपासून दूर असलेल्या फिरकीपटू हरभजन सिंगने भारतीय प्रशिक्षक आणि एकेकाळचा आपला सहकारी अनिल कुंबळे यांना भावनिक पत्र लिहिले आहे. रणजी करंडक स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या मानधनाच्या मुद्यावर सकारात्मक विचार करण्याची विनंती हरभजनने पत्राद्वारे केली आहे. हरभजनने पत्रात लिहिले आहे की, गेल्या २ ते ३ वर्षांपासून मी रणजी स्पर्धेमध्ये खेळतो आहे. प्रथम श्रेणीतील खेळाडूंच्या मानधनाचा संघर्ष हा मला अजिबात आवडत नाही. रणजी क्रिकेट असोसिएशन जगातील एक श्रीमंत बोर्ड आहे, असा उल्लेख ही हरभजनने केला आहे. तुम्ही या सर्व खेळाडूंसाठी एक आदर्श आहात, त्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी तुम्ही भारतीय नियामक मंडळासोबत चर्चा करावी. माझी अशी विनंती आहे की, सचिन, राहुल, लक्ष्मण आणि विरेंद्र सेहवाग या दिग्गजांशी चर्चा करुन प्रथम श्रेणीतील खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या मानधनाच्या पद्धतीमध्ये बदल करावा. सध्या प्रथम श्रेणीमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना प्रत्येक सामन्यासाठी १.५ लाख रुपये मानधन दिले जाते. यामध्ये दुलिप करंडक आणि रणजी करंडक या दोन्ही स्पर्धेचा सहभाग आहे. याच स्पर्धेत राष्ट्रीय संघातून खेळणाऱ्या खेळाडूला एका कसोटी सामन्यासाठी १५ लाख रुपये मिळतात. स्थानिक क्रिकेटमधील खेळाडूंसारखा निवाडा होत नाही. त्यामुळे हरभजनने भारतीय संघाचे प्रशिक्षक अनिल कुंबळेंना खेळाडूंच्या मानधनासाठी बीसीसीआयशी चर्चा करण्याची विनंती केली आहे.