ऑस्ट्रेलियाला त्यांच्यात भूमीत पराभवाचा धक्का दिल्यानंतर भारतीय संघ सध्या चांगलाच चर्चेत आहे. मात्र कसोटी संघात पुनरागमन केलेला हार्दिक पांड्या गेल्या काही दिवसांत त्याच्या संघातील कामगिरीमुळे नव्हे तर महिलांविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे चांगलाच चर्चेत आला होता. बॉलिवूड निर्माता करण जोहर याच्या ‘कॉफी विथ करन’ कार्यक्रमात हार्दिक पांड्याने महिलांविषयी अनेक आक्षेपार्ह वक्तव्य केली होती. ज्यानंतर सोशल मीडियावर नेटीझन्सी हार्दिकला चांगलंच फैलावर घेतलं.

सोशल मीडियावर टिकेचा होणारा भडीमार पाहता, हार्दिकने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सर्वांची माफी मागत, महिला वर्गाचा अनादर करण्याचा आपला कोणताही हेतू नसल्याचं म्हटलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार बीसीसीआयनेही हार्दिक पांड्याच्या आक्षेपार्ह वक्तव्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. एक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू या नात्याने कोणत्याही कार्यक्रमात बोलत असताना आपण भान राखलं पाहिले अशी प्रतिक्रीया एका अधिकाऱ्याने दिली आहे. अशा प्रकारची वक्तव्य कोणत्याही खेळाडूची कारकिर्द बिघडवण्यासाठी पुरेशी असतात, त्यामुळे भारतीय संघाचं नेतृत्व करणाऱ्या खेळाडूंनी प्रसारमाध्यमांवर व्यक्त होताना सर्व बाबींचा विचार करणं गरजेचं असल्याचंही बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने म्हटलं आहे.