टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या सध्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. लंडनमध्ये हार्दिक पांड्याच्या पाठीवर शस्त्रक्रीया करण्यात आली. यामधून हार्दीक हळुहळु सावरतो आहे. यावेळी वृत्तसंस्थेशी बोलत असताना हार्दिक पांड्याने आपल्या पुनरागमनाबद्दल भाष्य केलं आहे.

अवश्य वाचा – न्यूझीलंड दौऱ्यात पर्यायी सलामीवीरासाठी पृथ्वी शॉचं नाव चर्चेत

“मी माझ्या पाठीची काळजी घेऊन खेळत होतो. शस्त्रक्रीया करावी लागू नये यासाठी मी प्रयत्न करत होतो. मात्र बऱ्याच दिवसांनंतरही त्रास कमी होत नसल्यामुळे शस्त्रक्रीयेला पर्याय नसल्याचं मला डॉक्टरांनी सांगितलं. मी संघासाठी १०० टक्के कामगिरी करु शकत नव्हतो. एक खेळाडू म्हणून मी माझ्यावर आणि संघावर अन्याय करत असल्याचं मला वाटल्यामुळे मी शस्त्रक्रीयेचा निर्णय घेतला.” हार्दिक IANS वृत्तसंस्थेशी बोलत होता.

शस्त्रक्रीयेनंतर आता मी बरा होतो आहे. दुखापती या तुमच्या हातात नसतात. न्यूझीलंड दौऱ्याआधीच मी भारतीय संघात पुनरागमन करणार आहे. याच उद्देशाने मी ऑक्टोबर महिन्याच्या जवळपास शस्त्रक्रीयेचा निर्णय घेतला होता. न्यूझीलंड आणि आयपीएल मध्ये खेळल्यानंतर आगामी टी-२० विश्वचषकासाठी चांगला सराव होऊ शकतो, असं हार्दिकने स्पष्ट केलं. सध्या भारतीय संघ घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध मालिका खेळतो आहे. यानंतर २०२० साली जानेवारी महिन्यात न्यूझीलंड दौऱ्याला रवाना होण्यापूर्वी भारतीय संघ घरच्या मैदानावर श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध मर्यादीत षटकांचे सामने खेळणार आहे.