‘कॉफी विथ करण’ कार्यक्रमात महिलांविषयी केलेल्या वक्तव्यावरुन अष्टपैलू हार्दिक पांड्या आणि त्याचा सहकारी लोकेश राहुल यांच्यावर बीसीसीआयने निलंबनाची कारवाई केली आहे. या प्रकरणावरुन हार्दिक पांड्यावर सोशल मीडियामधून चांगलीच टिकेची झोड उठली होती. हार्दिक पांड्याचे मार्गदर्शक किरण मोरे यांनीही या प्रकरणातून हार्दिक धडा घेईल अशी आशा व्यक्त केली आहे.

अवश्य वाचा – दुष्काळात तेरावा महिना ! बंदीच्या शिक्षेनंतर कंपन्यांचीही हार्दिक-राहुलकडे पाठ

“आपण प्रत्येक जण आयुष्यात काही चुका करतो व त्यातून काही शिकत असतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हार्दिक अजुनही तुलनेने नवा आहे, आणि या प्रकरणामधून तो धडा घेईल अशी मला आशा आहे. या घटनेनंतर तो बदलेल असा मला विश्वास आहे. हार्दिक एक चांगला माणूस आहे, तो परत आल्यानंतर आम्ही या विषयावर एकदा नक्कीच बोलणार आहोत. तो मेहनती मुलगा आहे, याच जोरावर तो भारतीय संघापर्यंत पोहचला आहे.” किरण मोरे मिड-डे वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

अवश्य वाचा – हार्दिक-राहुलवर घातलेली बंदी योग्यच – हरभजन सिंह

हार्दिक आणि राहुल यांच्यावर निलंबनाची कारवाई केल्यानंतर, बीसीसीआयने विजय शंकर आणि शुभमन गिल यांची आगामी सामन्यांसाठी भारतीय संघात निवड केली आहे. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर 34 धावांनी मात करत 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. या मालिकेतला दुसरा सामना 15 तारखेला खेळवला जाणार आहे. त्यामुळे या सामन्यात कोणता संघ बाजी मारतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – हार्दिक-लोकेश राहुलच्या जागी शुभमन गिल-विजय शंकरची संघात निवड