औरंगाबाद, पुणे, मुंबईच्या खेळाडूंचा ठसा

वरळीतील महाराष्ट्र रायफल संघटनेच्या नेमबाजी रेंजवर झालेल्या ३५व्या महाराष्ट्र राज्य नेमबाजी स्पर्धेतील पिस्तूल प्रकारात औरंगाबाद, पुणे आणि मुंबईच्या नेमबाजांनी ठसा उमटवला. १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात औरंगाबादच्या हर्षदा निठवेने महिलांच्या वरिष्ठ आणि कनिष्ठ अशा दोन्ही गटांमध्ये सुवर्णपदक पटकावले.

अत्यंत अटीतटीच्या झालेल्या अंतिम सामन्यांमुळे खेळाडूंना पालक आणि प्रेक्षकांकडूनदेखील मनमुराद दाद मिळाली. स्पर्धेतील १० मीटर पिस्तूल आणि ५० मीटर पिस्तूल प्रकारात कनिष्ठ पुरुष, पुरुष, युवती, कनिष्ठ महिला आणि महिला गटांचे अंतिम सामने पार पडले. रविवारी झालेल्या अंतिम फेरीत हर्षदा निठवे,  श्रेया बडदे, अनिकेत खिडसे आणि कुणाल ससे यांनी आपापल्या गटात बाजी मारत सुवर्णपदक पटकावले. त्याआधी शनिवारी रात्री झालेल्या पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तूलमध्ये मुंबई उपनगरच्या रोनक पंडितने सुवर्ण जिंकले तर कनिष्ठ आणि युवा गटात कोल्हापूरच्या तेजस ढेरेने दुहेरी चमक दाखवली.

निकाल : १० मीटर एअर पिस्तूल (महिला) : १. हर्षदा निठवे (औरंगाबाद, २३३), २. अनुष्का पाटील (कोल्हापूर, २३१.४), ३. मनीषा राठोड (नाशिक, २०९.४). कनिष्ठ महिला गट : १. हर्षदा निठवे (औरंगाबाद, ५७१), २. श्रेया बदाडे (पुणे, ६५६), ३. अनुष्का पाटील (कोल्हापूर, ५६०), १० मीटर एअर पिस्तूल युवती : १. श्रेया बदाडे (पुणे, ५६५), २. आकांक्षा दीक्षित (सातारा, ५६०), ३. अनुष्का पाटील (कोल्हापूर, ५६०). ५० मीटर फ्री पिस्तूल (पुरुष) : १. अनिकेत खिडसे (मुंबई उपनगर, ५४१), २. महेश घाडगे (सातारा, ५३५), ३. हरेश कांबळे (मुंबई उपनगर, ५३३). कनिष्ठ : १. कुणाल ससे (पुणे, ५३२), २. सुशांत कवण (पुणे, ५२८), ३. अजिंक्य चव्हाण (सातारा, ५०३).