भारताची आघाडीची महिला धावपटू हिमा दासने करोना विषाणूविरोधातील लढ्यात आपलं महत्वाचं योगदान बजावलं आहे. आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदक विजेत्या हिमा दासने आपला एका महिन्याचा पगार आसाम सरकारच्या आरोग्य विभागाला दिला आहे. हिमाने आपल्या ट्विटर अकाऊंटवर यासंदर्भातली घोषणा केली आहे.

जगभरात अनेक लोकं करोना विषाणूच्या विळख्यात आलेली आहेत. चीन, फ्रान्स, इटली यासारख्या देशांना करोनाचा अधिक फटका बसला आहे. अनेक लोकांनी यामुळे आपले प्राणही गमवाले आहेत. जागतिक आरोग्य संघटना या विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करतेय. भारतामध्येही महत्वाच्या शहरात करोना बाधित रुग्ण आढळत आहेत. यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवस संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे.

हिमा दाससोबत भारतामधील अनेक क्रीडापटूंनी करोनाविरोधातील लढ्यात आपलं योगदान दिलं आहे. आतापर्यंत पी.व्ही.सिंधू, गौतम गंभीर, बजरंग पुनिया, इरफान-युसूफ पठाण, महेंद्रसिंह धोनी, सानिया मिर्झा, सचिन तेंडुलकर या खेळाडूंनी करोनाविरुद्ध लढ्यात आपलं सामाजिक भान राखत मदत केली आहे. याव्यतिरीक्त मुंबई क्रिकेट संघटनेनेही मुख्यमंत्री सहायता निधीला ५० लाखांची मदत केली आहे. परिस्थिती बिघडल्यास आपल्या अखत्यारीत येणारी मैदानं वैद्यकीय सुविधेसाठी खुली करण्याची तयारीही MCA ने दाखवली आहे.