प्रमुख खेळाडूंना झालेल्या दुखापतीमुळे कमकुवत झालेल्या भारतीय हॉकी संघाचे विश्वचषक अभियान बेल्जियमविरुद्धच्या लढतीने सुरू होणार आहे. वैभवशाली इतिहास असलेल्या भारतीय हॉकीच्या घसरणीमुळे गेल्या चार दशकांत भारतीय संघाला या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी पात्र ठरता आलेले नाही. या कटू आठवणी बाजूला सारत, नव्या ऊर्जेने खेळण्यासाठी सरदार सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सज्ज झाला आहे. १९७५ साली क्वालालम्पूर येथे झालेल्या स्पर्धेचे जेतेपद भारताने पटकावले होते. युरोपियन चषकाचे जेतेपद पटकावणाऱ्या बेल्जियम संघाने गेल्या तीन वर्षांत सातत्यपूर्ण प्रदर्शन करत आपली छाप उमटवली आहे.  
२०११ मध्ये जोहान्सबर्ग येथे झालेल्या चॅम्पियन्स चॅलेंज स्पर्धेत, शेवटच्या पाच मिनिटांमध्ये, दोन गोलची पिछाडी भरून काढत बेल्जियमने भारतावर सनसनाटी विजय मिळवला होता. भारताविरुद्धच्या चारपैकी केवळ एका लढतीत बेल्जियमचा पराभव झाला आहे. या पाश्र्वभूमीवर विश्वचषकाच्या लढतीत बेल्जियमचे पारडे जड मानले जात आहे. वर्ल्ड लीग फायनल्स स्पर्धेत बेल्जियमने भारताविरुद्धची शेवटची लढत खेळली होती. या लढतीत त्यांनी भारतावर सहज विजय मिळवला होता. या पराभवाची परतफेड करण्याची संधी भारतीय संघाला आहे.
भारताच्या गटात गतविजेत्या ऑस्ट्रेलियासह, स्पेन, बेल्जियम, इंग्लंड आणि मलेशिया असे तुल्यबळ संघ आहेत.