आयपीएलमुळे भारतीय संघात अनेक नवोदीत खेळाडूंना संधी मिळायला लागली. याआधी केवळ रणजी आणि बीसीसीआयच्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये केलेल्या कामगिरीच्या निकषांवर संघात खेळाडूंची निवड केली जायची. मात्र आयपीएल सुरु झाल्यापासून छोट्या शहरातील अनेक खेळाडूंना भारतीय संघाची कवाडं खुली झाली. मुंबई इंडियन्स संघाकडून खेळणारा हार्दिक पांड्याही अशाच तरुण खेळाडूंपैकी एक. मात्र भारत-न्यूझीलंड मालिकेदरम्यान हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्स संघाला रामराम ठोकणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र हार्दिक पांड्याने हे वृत्त चुकीचं असल्याचं सांगितलं आहे.

अवश्य वाचा – चेन्नई सुपरकिंग्ज धोनी, आश्विनला संघात कायम ठेवणार; रैनाला डच्चू मिळण्याचे संकेत

News 18 या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हार्दिक पांड्या म्हणाला, “मी मुंबई इंडियन्स सोडणार असल्याचं मलाच बाहेरुन कळलं. मात्र यात जराही तथ्य नाहीये. मुंबई इंडियन्स संघात खेळण्याची संधी मिळाल्यानंतर माझं आयुष्य अमुलाग्र बदललं आहे. मुंबईच्या संघामुळे मला भारतीय संघात खेळण्याची संधी मिळाली. मग अशा परिस्थितीत मी मुंबई इंडियन्स का सोडेन?? या बातम्यांमुळे मी स्वतः खूप निराश झालो होतो, मात्र या बातमीत जराही तथ्य नसल्याचं”, हार्दिक पांड्याने आवर्जुन सांगितलं. माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या वेळेतच मला काही काळ अपयशाचा सामना करावा लागला. मात्र यातून सावरत मी स्वतःच्या खेळात सुधारणा केली, आणि कोणताही खेळाडू अशाचप्रकारे आपला खेळ सुधरवत असतो; असंही हार्दिक म्हणाला.

हार्दिक पांड्या रणजी स्पर्धेत बडोद्याच्या संघाकडून खेळतो. २०१३ साली हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्स संघात जागा मिळाली. यानंतर गेल्या ३ वर्षांत हार्दिकने आपल्या कामगिरीत सुधारणा करत, मुंबई इंडियन्सच्या संघासोबत भारतीय संघातही आपलं स्थान निश्चीत केलं आहे. भारतीय संघाप्रमाणे मुंबई इंडियन्स संघातही हार्दिक पांड्या मधल्या फळीत महत्वाची जबाबदारी निभावतो. याचसोबत गोलंदाजीत जमलेली जोडी फोडण्यात हार्दिकचा हातखंडा आहे. १० हंगाम पार पाडल्यानंतर ११ व्या हंगामासाठी लिलावात आपल्यावर सर्वात मोठी बोली लावली जावी याकरता हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्स संघ सोडणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांमध्ये सुरु होत्या. मात्र हार्दिकनेच या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

वन-डे, कसोटी आणि टी-२० अशा तिनही प्रकारात हार्दिक पांड्याने आपली चमक दाखवली आहे. मात्र सध्या सुरु असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत हार्दिकची संघात निवड करण्यात आलेली नाहीये. त्यातच येत्या काही दिवसांमध्ये आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिल संघमालकांसाठी खेळाडूंना कायम राखण्याची (Retaintion Policy) पॉलिसी जाहीर करणार आहे. त्यामुळे २०१८ च्या हंगामात हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्स आपल्या संघात कायम राखते की हार्दिक दुसऱ्या संघाकडून खेळतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.