मुंबईच्या वानखेडे मैदानावर २०११ झाली भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेला विश्वचषकाचा अंतिम सामना फिक्स होता असा आरोप, लंकेचे माजी क्रीडामंत्री महिंदानंद अलुथगमगे यांनी केला होता. यानंतर क्रीडा विश्वात एकच खळबळ माजली होती. लंकेच्या तत्कालीन संघाचा कर्णधार कुमार संगकारा आणि अंतिम सामन्यात शतक झळकावलेल्या महेला जयवर्धनेने माजी क्रीडामंत्र्यांच्या आरोपांचं खंडन केलं होतं. यानंतर Daily Mirror वृत्तपत्राशी बोलत असताता, अलुथगमगे यांनी आपण याबद्दल आयसीसीकडे तक्रार दाखल केली असून, आपण कोणत्याही श्रीलंकेच्या खेळाडूंवर आरोप केलेले नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

“विश्वचषकाचा सामना हरल्यानंतर, वर्षभरातच काही ठराविक अधिकाऱ्यांनी कंपनी खरेदी केल्या, स्वतःचा वेगळा धंदा सुरु केला…हे कसं शक्य आहे?? अंतिम सामन्यात श्रीलंकेचा जो संघ खेळला तो मुळात आम्ही निवडलेला संघच नव्हता. शेवटच्या क्षणाला क्रीडामंत्री या नात्याने मी किंवा कोणत्याही संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा न करता ४ नवीन खेळाडूंना संघात जागा देण्यात आली. लंकन क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांनाही याबद्दल अंधारात ठेवण्यात आलं. हे सगळं मी पाहिलं आहे कारण त्या सामन्याला मी हजर होतो. कोणत्याही चर्चेशिवाय ४ नवीन खेळाडूंना संघात स्थान कसं मिळतं. इतरांच्या तुलनेत ४ नव्या खेळाडूंचा अनुभव कमी होता.” अलुथगमगे यांनी आपली बाजू मांडली.

या सर्व घटनेत मी कोणत्याही श्रीलंकन खेळाडूवर आरोप केला नसल्याचं अलुथगमगे यांनी स्पष्ट केलं. अंतिम सामन्यात शतक झळकावणाऱ्या महेला जयवर्धने याने क्रीडामंत्र्यांच्या आरोपावर, निवडणुका जवळ आल्या आहेत का?? कारण सर्कस सुरु झाली आहे असं खोचक वक्तव्य केलं होतं. यावर उत्तर देताना अलुथगमने म्हणाले, “संगकारा किंवा जयवर्धनेला यावर व्यक्त होण्याची गरज नाही, मी कोणत्याही खेळाडूवर आरोप केला नाही. माझ्या दोन-अडीच मिनीटाच्या मुलाखतीला एवढं का लक्ष्य केलं जातंय…याआधी अर्जुन रणतुंगानेही मॅच फिक्सींगचे आरोप केले होते.”

अवश्य वाचा – २०११ विश्वचषकाचा अंतिम सामना फिक्स होता : श्रीलंकन सरकार आरोपांची चौकशी करणार