क्रिकेट विश्वचषक २०१५च्या भारतीय संघात पुनरागमन करणे हेच लक्ष्य असल्याचे भारताचा फिरकीपटू हरभजन सिंगने म्हटले आहे. हरभजन नेतृत्व करत असलेल्या पंजाब संघाने विजय हजारे एकदिवसीय स्पर्धेत उपविजेतेपद प्राप्त केले त्यावेळी तो बोलत होता.
स्थानिक क्रिकेटमध्ये सध्या भरपूर मेहनत घेत असून समानधानकारक कामगिरी होत आहे परंतु, येऊ ठेपलेल्या विश्वचषक स्पर्धेच्या भारतीय संघात पुनरागमन करणे हेच आपले प्रमुख लक्ष्य आहे, असे हरभजन पंजाब संघाकडून विजय हजारे स्पर्धेच्या उपविजेतेपदाचा चषक स्विकारताना म्हणाला. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होणाऱया विश्वचषकासाठी भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळणे ही महत्त्वाचीबाब ठरेल. प्रत्येक खेळाडूसाठी विश्वचषक स्पर्धा मोठी असते आणि मी माझ्या आशा सोडलेल्या नाहीत, असेही तो पुढे म्हणाला.
आपण विश्वचषक स्पर्धेसाठीच्या भारतीय संघातील सहभागी खेळाडू होणार आहोत हाच विचार ठेवून दिवसाची सुरूवात सकारात्मकरित्या करतो. आणि त्यादृष्टीने मैदानावर परिश्रम घेतो. नक्कीच भारतीय संघात पुनरागमन करणे हेच मुख्य लक्ष्य आहे व त्यासाठी मी स्वत:ला नेहमी प्रोत्साहन देऊन खेळतो, असेही तो पुढे म्हणाला.