भारतीय संघाचा फिरकीपटू हरभजन सिंहचं नाव पंजाब सरकारने खेलरत्न पुरस्काराच्या शर्यतीमधून मागे घेतलं. यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. मात्र यानंतर हरभजन सिंहने या प्रकरणावर स्पष्टीकरण देत, आपणच सरकारला नाव मागे घेण्याची विनंती केली होती असं सांगितलं आहे. खेलरत्न पुरस्कारासाठी कोणत्याही खेळाडूने ३ वर्ष आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करणं हा निकष असतो. हरभजनने आपल्या ट्विटर अकाऊंटवर आपलं म्हणणं मांडलं आहे.

गेल्या काही वर्षांपासून हरभजन सिंह भारतीय संघात खेळत नाहीये. आयपीएलमध्ये हरभजन चेन्नईचं प्रतिनिधीत्व करत असला तरीही भारतीय संघात पुनरागमन करण्याचं त्याचं स्वप्न अधुरच आहे. भारताचा अनुभवी फिरकीपटू अशी ओळख असलेल्या हरभजनने आतापर्यंत १०३ कसोटी, २३६ वन-डे सामने खेळले आहेत. कसोटी आणि वन-डे क्रिकेटमध्ये हरभजनच्या नावावर अनुक्रमे ४१७ आणि २६९ बळी जमा आहेत.