दुसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहलीला त्याच्या मैदानातील आक्रमक स्वभावामुळे टीकेचा धनी व्हायला लागलं. 26 डिसेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातला तिसरा कसोटी सामना मेलबर्नच्या मैदानावर सुरु होणार आहे. मात्र प्रसारमाध्यमांमध्ये आपल्या स्वभावावरुन होत असलेल्या टीकेबद्दल विचारलं असता, कोहलीने मी कोण आहे हे लोकांना सांगत बसायची गरज वाटत नाही असं म्हटलं आहे.

अवश्य वाचा – IND vs AUS : अजिंक्य चांगला कर्णधार होऊ शकतो, मिचेल जॉन्सनने विराटला डिवचलं

“मी कसा आहे किंवा मैदानात मी कसा वागतो हे मी लोकांना बाहेर जाऊन सांगणार नाहीये, मला त्याची गरजही वाटत नाही. या सर्व गोष्टी मैदानाबाहेर घडत असतात. लोकं बाहेर काय चर्चा करतायत यावर मी नियंत्रण ठेऊ शकत नाही. हा प्रत्येकाने समजून घेण्याचा मुद्दा आहे. माझ्यासमोर तिसरा कसोटी सामना जिंकणं हे एकमेव लक्ष्य आहे, याव्यतिरीक्त मला कोणत्याही गोष्टीवर लक्ष केंद्रीत करायचं नाहीये.” बॉक्सिंग डे कसोटीआधी पत्रकारांशी संवाद साधत असताना विराटने आपली बाजू मांडली.

अवश्य वाचा – IND vs AUS : गोलंदाज चांगल्या लयीत, फलंदाजांनी कामगिरीत सुधारणा करण्याची गरज – अजिंक्य रहाणे

“वृत्तपत्रांमध्ये माझ्याविषयी काय छापून येतंय याची मला काळजी वाटत नाही. कारण ते विचार माझे नाहीयेत. प्रत्येकाचे आपापले विचार असतात आणि मी त्यांचा आदर करतो. मला फक्त क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करायचं असून संघाला मालिका विजय मिळवून देणं हे माझं ध्येय आहे.” विराटने आपल्याबद्दल सुरु असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला. जी लोकं मला चांगली ओळखून आहेत, ते माझ्याविषयी असं कधीच बोलणार नाहीत, असंही विराटने यावेळी म्हटलं. सध्या 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारत 1-1 ने बरोबरीत आहे.

अवश्य वाचा – BLOG : बॉक्सिंग डे कसोटीतून भारताला सापडलेले 3 बॉक्सर्स !