शनिवारपासून सुरु होणाऱ्या आयपीएलच्या बाराव्या हंगामासाठी सर्व खेळाडू सज्ज झालेले आहेत. मात्र ३० मे पासून इंग्लंडमध्ये सुरु होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी प्रत्येक खेळाडूने स्वतःवर येणाऱ्या ताणाचा विचार करावा असा सल्ला कर्णधार विराट कोहलीने दिला आहे. विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड अद्याप झालेली नाहीये. एका जागेसाठी संघात अजुनही विचार सुरु असल्याचं विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेच्या अखेरच्या सामन्यात नमूद केलं होतं. यादरम्यान उमेश यादवने, स्वतःला विश्वचषक संघात अतिरीक्त गोलंदाजाच्या भूमिकेसाठी योग्य म्हटलं आहे.

“जर विश्वचषकात निवड होण्यासाठी आयपीएल हे व्यासपीठ असेल तर मी यासाठी योग्य उमेदवार आहे. संघातल्या चौथ्या अतिरीक्त गोलंदाजाच्या जागेसाठी मी योग्य आहे. माझ्या मते एकाही नवोदीत गोलंदाजाने सिनीअर खेळाडूची जागा घ्यावी अशी कामगिरी केलेली नाहीये.” उमेश यादव IANS वृत्तसंस्थेशी बोलत होता.

“विश्वचषकाच्या स्पर्धेत अनुभव हा महत्वाचा मुद्दा ठरेल. १०-१२ सामन्यांचा अनुभव असलेल्या गोलंदाजाला विश्वचषकात संधी देणं योग्य ठरणार नाही. एखाद्या अटीतटीच्या सामन्यात जर तुमचा महत्वाचा गोलंदाज जायबंदी झाला तर त्याला पर्याय म्हणून अनुभवी गोलंदाज संघामध्ये असायला हवा.” उमेशने स्वतःची बाजू ठामपणे मांडली. उमेश यादव आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून खेळणार आहे.