पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रावळपिंडी एक्स्प्रेस नावाने ओळखला जाणाऱ्या शोएब अख्तरने मॅच फिक्सिंगसंदर्भात एक मोठं विधान केलं आहे. एका मुलाखतीमध्ये बोलत असताना शोएबने, आपल्या कार्यकाळात मी २१ खेळाडूंविरोधात खेळायचो असं विधान केलं आहे. “यातले ११ खेळाडू हे प्रतिस्पर्धी संघाचे असायचे तर १० खेळाडू हे माझ्याच संघातले असायचे. मी कधीही मॅच फिक्सिंगसारख्या प्रकारात अडकलो नाही. माझ्यासोबत मोहम्मद आमिर आणि मोहम्मद आसिफसारखे फिक्सर खेळाडू होते. पण मी यापासून स्वतःला नेहमी दूर ठेवलं.”

मी ज्यावेळी मैदानात उतरायचो त्यावेळी माझ्या मनात कायम एकच विचार असायचा, तो म्हणजे मी माझ्या देशाला कधीही दगा देणार नाही. माझ्या संघात आजुबाजूला फिक्सर खेळत असताना मी कधीच त्यामध्ये सहभागी झालो नाही. कधीकधी मलाच कळायचं नाही की कोण मॅच फिक्सिंग करतंय आणि कोण नाही !” Rewind with Samin Pirzada या टॉक शोमध्ये शोएब अख्तर बोलत होता.

यावेळी बोलत असताना शोएब म्हणाला, “मोहम्मद आसिफने माझ्याकडे मॅच फिक्सिंग केल्याची कबुली दिली होती. आमिरही या प्रकारात सहभागी होता. मी या दोघांनाही मारणार होतो, पण ते माझ्या हाती लागले नाही. मी त्यावेळी भिंतीवर माझा राग काढला होता. पाकिस्तानचे दोन चांगले गोलंदाज फिक्सिंगमुळे वाया गेले. या खेळाडूंनी देशाला विकण्याचं काम केलं आहे, माझ्यादृष्टीने हा गुन्हा आहे.”