माझा माझ्या खेळावर पूर्ण विश्वास आहे आणि एक दिवस मी परत कसोटी संघामध्ये परतेन, असा विश्वास टीम इंडियाचा सलामीचा फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने ‘ट्विटर’वर व्यक्त केला. ऑस्ट्रेलियाबरोबर सुरू असलेल्या कसोटी मालिकेच्या उर्वरित दोन सामन्यांसाठी सेहवागला संघातून वगळण्यात आलंय. निवड समितीने घेतलेल्या या निर्णयाबद्दल आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सेहवागने संघामध्ये परतण्याचा विश्वास व्यक्त केला.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटीत सेहवागची कामगिरी फारशी समाधानकारक झाली नाही. दोन कसोटीतील तीन डावांत मिळून सेहवागने अवघ्या २७ धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याला संघातून वगळण्यात येईल, अशी शक्यता होतीच. त्यावर निवड समितीने शिक्कामोर्तब केले.
सेहवागने लिहिले आहे की, संघामध्ये पुन्हा स्थान मिळवण्यासाठी माझे प्रयत्न सुरूच राहतील. मला माझ्या खेळावर पूर्ण विश्वास आहे आणि मी परत संघात स्थान नक्कीच मिळवेन. पुढील दोन कसोटींसाठी त्याने संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.