भारत-पाकिस्तान सामना म्हणजे क्रिकेट विश्वासाठी अतिमहत्वाचा. हेच अचूक हेरले ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी). त्यामुळेच गेल्या काही आयसीसीच्या स्पर्धामध्ये भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या देशांना एकाच गटात आणल्याचे पाहिले गेले आहे आणि या गोष्टीचा फायदाही आयसीसीने उचलला आहे. आयसीसीच्या अधिकाऱ्यांनी सुरुवातीला भारत-पाकिस्तान यांना एकाच गटात जाणून बुजून ठेवत असल्याचे मान्यही केले. पण ही बातमी जनमानसात पोहोचल्यावर मात्र आयसीसी ने या वृत्ताचा इन्कार केला आहे.
पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स करंडकामध्येही भारत आणि पाकिस्तान यांना एकाच गटात खेळवण्याचा ‘खेळ’ आयसीसीने केला असल्याचे दिसले आहे. याबाबत आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्ह रिचर्डसन यांना विचारले असता ते म्हणाले की, ‘ भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये लढत व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. आयसीसीच्या दृष्टीकोनातून ते महत्वाचे आहे. क्रिकेट जगताबरोबर चाहतेही या सामन्याची अपेक्षा करत असतात. स्पर्धेसाठीही ही महत्वाची गोष्ट असते, त्यामुळे स्पर्धेलाही चांगली चालना मिळते.’
आयसीसीच्या प्रवक्तायाने यावेळी सांगितले की, ‘रिचर्डसन यांनी आपल्या मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, आठ संघांच्या क्रमवारीनुसारच आयसीसीच्या स्पर्धेचे वेळापत्रक बनवले जाते. त्यानुसार ऑस्ट्रेलिया, इंग्लंज, न्यूझीलंडसारखे देश हे ‘अ’ गटामध्ये आहेत आणि भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ ‘ब’ गटामध्ये आहेत.’
कसोटी क्रिकेटला प्रोत्साहन हवे – रिचर्डसन
कसोटी क्रिकेटला प्रोत्साहन देण्याची गरज असून त्यासाठी योग्य ती उपाययोजना करायला हवी, असे मत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्ह रिचर्डसन यांनी व्यक्त केले आहे. या बैठकीमध्ये क्रिकेटला कसोटी क्रिकेटमध्ये अधिक रस कसा निर्माण करता येईल, यावर चर्चा करण्यात येणार आहे.