ICC च्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा कालावधी ठरलेला असतो. ICC ची एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा दर चार वर्षांनी तर टी २० स्पर्धा दर दोन वर्षांनी खेळवली जाते. आता मात्र टी २० विश्वचषक स्पर्धा दरवर्षी आणि एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा दर ३ वर्षांनी आयोजित करण्याचा विचार ICC करत आहे. दरम्यान, याच मुद्द्यावरून ICC आणि BCCI यांच्यात मतभेद होताना दिसून येत आहेत.

ICC च्या नव्या FTP (फ्यूचर टूर प्रोग्राम) वर BCCI ने नाराजी व्यक्त केली आहे. या नव्या कार्यक्रमाअंतर्गत एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा दर चार वर्षांऐवजी दर तीन वर्षांनी तर टी २० विश्वचषक स्पर्धा दरवर्षी भरवण्यात यावी, असा प्रस्ताव ICC ने ठेवला आहे. पण BCCI ला मात्र हा प्रस्ताव अजिबात मान्य नाही. २०२३ ते २०२८ या कालावधीत जगभरातील मीडिया विश्वात जास्तीत जास्त प्रायोजकत्व मिळवणे आणि त्या माध्यमातून अधिकाधिक कमाई करणे हा या नव्या प्रस्तावामागील हेतू आहे.

BCCI चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांनी एक पत्र लिहून ICC कडे आपली नाराजी व्यक्त केली आहे. २०२३ च्या नंतर ICC च्या ज्या स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत त्या प्रस्तावाला BCCI चा पाठिंबा नाही. BCCI च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की मंडळाच्या निवडणुकांनंतर ICC च्या या प्रस्तावावर चर्चा करून या निर्णयावर ठोस पावलं उचलण्यात येतील. मात्र टी २० क्रिकेट स्पर्धा दरवर्षी भरवणे हे रोमांचक असेल असेही त्या अधिकाऱ्याने सांगितले.

दरम्यान, ICC जर हा प्रस्ताव घेऊन माध्यमविश्वात गेली, तर राजस्व हक्कासाठी मिळणारा मोठा आर्थिक वाटा हा ICC ला जाऊ शकतो. त्यामुळे BCCI या मुद्द्याला विरोध करत असल्याचे बोलले जात आहे.