चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात महामुकाबला पाहायला मिळणार आहे. पाकिस्तानने इंग्लंडला पराभूत करुन अंतिम फेरीत प्रवेश केल्यापासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात अंतिम लढत पाहण्यास मिळणार, असा अंदाज क्रिकेट चाहत्यांनी वर्तवला होता. गुरुवारी अनेक चाहत्यांचा हा अंदाज खरा ठरवत भारताने बांगलादेशला पराभूत करुन अंतिम फेरी गाठली. भारताच्या या विजयानंतर सोशल मीडियावर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याविषयीच्या चर्चांना उधाण आले आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटचा सामना नेहमीच दोन्हीं देशातील नागरिकांसाठी प्रतिष्ठेचा मानलो जातो. या सामन्यात भारत पुन्हा पाकिस्तानवर भारी पडेल, असे भारतीयांना वाटत आहे. तर पाकिस्तानी संघ हा इतिहास खोडून नवा इतिहास रचण्यास मैदानात उतरेल, असे पाकिस्तानच्या चाहत्यांना वाटते. याच पार्श्वभूमीवर भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाने भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना युद्ध नव्हे तर खेळ म्हणून पाहा, अशा आशयाचे सूचक रिट्विट केले आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील उपांत्य सामन्यानंतर इंद्रनील दास यांनी भारत पाकिस्तान सामन्यापूर्वी हा सामना खेळ भावनेने पाहावा, अशा आशयाचे ट्विट केले. त्यांनी या ट्विटमध्ये लिहिलंय की, रविवारच्या सामन्याकडे फक्त खेळ म्हणून पाहायला हवे. हा सामना जगणे किंवा मरणे यासाठीचे युद्ध नाही. स्पर्धेतील तो एक महत्त्वाचा सामना आहे. इंद्रनील दास यांनी केलेले ट्विट सानियाने रिट्विट केले आहे. सानियाचा पती शोएब मलिक हा पाकिस्तानच्या संघात असला तरी टेनिस कोर्टवर भारताचे प्रतिनिधित्व करणारी सानिया यापूर्वीही भारतीय संघाच्या बाजूने उभी राहिल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे या ट्विटच्या माध्यमातून रविवारी मैदानावर रंगणारा सामना खेळ म्हणून पाहावा, असे तिने सांगण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. स्वत: खेळाडू असल्यामुळे मैदानातील महामुकाबला खिलाडूवृत्तीने पाहाण्याचा तिच्या सूचक रिट्विटवर अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतील अंतिम सामना रंगणार आहे. यापूर्वी साखळी सामन्यात भारताने पाकिस्तानला पराभूत केले होते. या कामगिरीची पुनरावृत्तीच्या इराद्याने भारतीय संघ मैदानात उतरेल. याउलट भारताविरुद्ध दबावत न खेळता चांगली खेळी करण्याचा प्रयत्न पाकिस्तान संघाचा असेल.