चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात महामुकाबला पाहायला मिळणार आहे. पाकिस्तानने इंग्लंडला पराभूत करुन अंतिम फेरीत प्रवेश केल्यापासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात अंतिम लढत पाहण्यास मिळणार, असा अंदाज क्रिकेट चाहत्यांनी वर्तवला होता. गुरुवारी अनेक चाहत्यांचा हा अंदाज खरा ठरवत भारताने बांगलादेशला पराभूत करुन अंतिम फेरी गाठली. भारताच्या या विजयानंतर सोशल मीडियावर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याविषयीच्या चर्चांना उधाण आले आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटचा सामना नेहमीच दोन्हीं देशातील नागरिकांसाठी प्रतिष्ठेचा मानलो जातो. या सामन्यात भारत पुन्हा पाकिस्तानवर भारी पडेल, असे भारतीयांना वाटत आहे. तर पाकिस्तानी संघ हा इतिहास खोडून नवा इतिहास रचण्यास मैदानात उतरेल, असे पाकिस्तानच्या चाहत्यांना वाटते.