ICC World Cup 2019 IND vs AUS Live Updates : इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या विश्वचषक स्पर्धेत भारताने ऑस्ट्रेलियावर दमदार विजय मिळवला. शिखर धवनच्या शतकाच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाला ३५३ धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान पार करताना ऑस्ट्रेलियाला केवळ ३१६ धावांपर्यंतच मजल मारता आली. या विश्वचषक स्पर्धेत हा त्यांचा पहिलाच पराभव झाला. तसेच आव्हानाचा पाठलाग करताना १९९९ च्या विश्वचषक स्पर्धेनंतर ऑस्ट्रेलियाचा हा पहिलाच पराभव ठरला. सलामीवीर शिखर धवनचे दमदार शतक (११७) आणि उपकर्णधार रोहित शर्मा (५७) व कर्णधार विराट कोहली (८२) यांची अर्धशतके यांच्या खेळीच्या बळावर भारताने प्रथम फलंदाजी करत ५० षटकात ३५२ धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियाला ३५३ धावांचे आव्हान दिले. ३५३ धावांचे आव्हान पार करण्यासाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियाने चांगली सुरुवात करत अर्धशतकी सलामी दिली, पण त्यानंतर ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का बसला. वैयक्तिक ३६ या धावसंख्येवर कर्णधार फिंच धावबाद झाला. अतिशय सावध आणि संथ खेळी करत सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने ७७ चेंडूत अर्धशतक ठोकले. या बरोबरच ऑस्ट्रेलियानेही २० व्या षटकात शंभरी गाठली. अतिशय संथ अर्धशतक केल्यानंतर धावगती वाढवण्याची वॉर्नरवर जबाबदारी होती. त्यानुसार त्याने फटकेबाजीचा प्रयत्न केला. पण त्याचा तो प्रयत्न फसला आणि अर्धशतकवीर वॉर्नर झेलबाद झाला. चहलने त्याला ५६ धावांवर माघारी धाडले. शांत आणि संयमी खेळी करणाऱ्या स्टीव्ह स्मिथने अर्धशतक झळकावले. त्याने या अर्धशतकासाठी त्याला ६० चेंडू खेळावे लागले. उस्मान ख्वाजाने फटकेबाजीला सुरुवात केली होती. मात्र तो ४२ धावांवर माघारी परतला. अप्रतिम फलदांजी करणारा स्टीव्ह स्मिथ अर्धशतक झाल्यावर भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. त्याने ५ चौकार आणि १ षटकार यांच्या मदतीने ७० चेंडूत ६९ धावा केल्या. अर्धशतकवीर स्टीव्ह स्मिथ बाद झाल्यानंतर त्याच षटकात स्मिथपाठोपाठ स्टॉयनीस बाद झाला. भोपळाही न फोडता तो त्रिफळाचीत झाला. भुवनेश्वरने एका षटकात २ बळी टिपले. फटकेबाजी करण्यात तरबेज असलेला धोकादायक फलंदाज ग्लेन मॅक्सवेल मोठा फटका मारताना बाद झाला. त्याने १४ चेंडूत २८ धावा केल्या. विजयासाठी अपेक्षित धावगती गाठण्यासाठी कुल्टर-नाईलने फटकेबाजीचा पर्याय स्वीकारला पण त्यातच तो झेलबाद झाला आणि ऑस्ट्रेलियाला सातवा धक्का बसला. त्याने केवळ ४ धावा केल्या. यष्टीरक्षक अलेक्स कॅरीने दमदार अर्धशतक ठोकले, पण त्याचा फारसा उपयोग होऊ शकला नाही आणि भारताने सामना ३६ धावांनी जिंकला. त्याआधी, नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी करण्यास सुरुवात केली. रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी आपापली अर्धशतके पूर्ण करून भारताला शतकी सलामी मिळवून दिली. सलामीवीर रोहित शर्माने ७० चेंडूत ३ चौकार आणि १ षटकार खेचत ५७ धावा केल्या. पण कुल्टर-नाईलच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. पण धवनने विराटच्या साथीने डाव पुढे नेला आणि दमदार शतक झळकावले. शतक झाल्यावर मोठे फटके खेळताना धवन बाद झाला. मोठा फटका खेचण्याच्या प्रयत्नात तो ११७ धावावर झेलबाद झाला. मिचेल स्टार्कने धवनला माघारी पाठवले आणि भारताला दुसरा धक्का दिला. धवनने १६ चौकार लगावले. त्यानंतर हार्दिक पांड्याला फलंदाजीच्या क्रमवारीत बढती देण्यात आली. त्याने त्याच्या बढतीचा पूर्ण उपयोग केला. त्याने २७ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकार यांच्या मदतीने ४८ धावा केल्या. २ धावांनी त्याचे अर्धशतक हुकले. पण कर्णधार कोहलीने एक बाजू लावून धरत दमदार ८२ धावा केल्या. तोदेखील मोठा फटका खेळताना बाद झाला. त्याने त्याच्या खेळीत ४ चौकार आणि २ षटकार खेचले. अनुभवी धोनीनेदेखील झकास खेळी करत १४ चेंडूत २७ धावा केल्या. तर शेवटच्या षटकात फलंदाजीला आलेल्या लोकेश राहुलने ३ चेंडूत ११ धावा केल्या आणि भारताला २५२ धावांपर्यंत पोहोचवले. ऑस्ट्रेलियाकडून स्टोयनीसने २ तर कुल्टर-नाईल, स्टार्क आणि कमिन्स यांनी १-१ बळी टिपला.