भारतीय संघाला उपांत्य फेरीत न्यूझीलंडच्या संघाकडून पराभव स्वीकारावा लागला. फलंदाजांच्या सुमार कामगिरीचा फटका भारताला बसला आणि भारताचे विश्वचषक स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. २४० धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा डाव २२१ धावांवरच आटोपला. स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा रोहित शर्मा उपांत्य फेरीत मात्र केवळ १ धाव करून माघारी परतला. या पराभवानंतर रोहित शर्माने ट्विट करून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. "मोक्याच्या क्षणी आम्ही अपयशी ठरलो. जेव्हा संघातील खेळाडूंकडून सर्वोत्तम कामगिरी करण्याची अपेक्षा होती, त्याच परीक्षेत आम्ही नापास झालो. केवळ ३० मिनिटांचा खराब खेळ आणि आमची विश्वचषक उंचावण्याची संधी गेली. तुम्ही सारे (चाहते) जितके दुःखी आहात, तितकाच मी देखील दुःखी आहे. भारताबाहेर स्पर्धा असूनही साऱ्या चाहत्यांचा उत्साह पाहून भारावून गेलो. इंग्लंडमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल सर्व चाहत्यांचे आभार", असे ट्विट हिटमॅनने केले. We failed to deliver as a team when it mattered, 30 minutes of poor cricket yesterday & that snatched away our chance for the cup. My heart is heavy as I’m sure yours is too.The support away from home was incredible.Thank you all for painting most of uk blue wherever we played — Rohit Sharma (@ImRo45) July 11, 2019 दरम्यान, गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर केन विल्यमसनच्या न्यूझीलंडने २०१९ विश्वचषक स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश केला. अखेरच्या षटकांपर्यंत रंगलेल्या सामन्यात न्यूझीलंडने भारतावर १८ धावांनी मात केली. भारताचा संघ २२१ धावांपर्यंतच मजल मारु शकला. २४० धावांचा पाठलाग करताना भारताचा डाव कोलमडला. रविंद्र जाडेजा आणि महेंद्रसिंह धोनी यांनी सातव्या विकेटसाठी महत्वाची भागीदारी रचत सामन्यात रंगत निर्माण केली. मात्र अखेरच्या षटकात झटपट धावा करणं भारतीय फलंदाजांना जमलं नाही. रविंद्र जाडेजा आणि धोनीच्या मोक्याच्या क्षणी माघारी परतल्यामुळे भारताचा संघ बॅकफूटला ढकलला गेला. रविंद्र जाडेजाने ७७ तर धोनीने ५० धावा केल्या. या पराभवासह भारताचं विश्वचषक स्पर्धेतलं आव्हानही संपुष्टात आलं आहे. न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीने ३, मिचेल सँटनरने-ट्रेंट बोल्टने २-२ तर फर्ग्युसन आणि निशमने १-१ बळी घेतला. भारताचा एक फलंदाज धावबाद झाला.