लियाम प्लंकेट आणि ख्रिस वोक्स यांनी टिच्चून मारा करत विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडला विजयपथावर आणलं आहे. ३३८ धावांचा पाठलाग करताना भारताचा संघ ३०६ धावांपर्यंतच मजल मारु शकला. इंग्लंडने ३१ धावांनी सामन्यात बाजी मारत, उपांत्य फेरीसाठी आपलं आव्हान जिवंत ठेवलं आहे. इंग्लंडचा साखळी फेरीत आता न्यूझीलंडशी सामना होणं बाकी आहे. मात्र भारताच्या पराभवामुळे पाकिस्तानच्या गोटात चिंतेच वातावरण पसरलं आहे. उपांत्य फेरीत दाखल होण्यासाठी पाकिस्तानला बांगलादेशविरुद्ध विजयासोबत इतर संघाच्या कामगिरीवरही अवलंबून रहावं लागणार आहे. ३३८ धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. लोकेश राहुल एकही धाव न काढता माघारी परतला. ख्रिस वोक्सने त्याचा बळी घेतला. मात्र यानंतर कर्णधार विराट कोहली आणि उप-कर्णधार रोहित शर्माने शतकी भागीदारी रचत संघाचा डाव सावरला. या शतकी भागीदारीदरम्यान दोन्ही खेळाडूंनी आपली अर्धशतकं साजरी केली. रोहित-विराटची जोडी भारताला विजय मिळवून देईल असं वाटत असतानाच लियाम प्लंकेटने विराटला माघारी धाडलं. त्याने ६६ धावांची खेळी केली. यानंतर रोहित शर्माने ऋषभ पंतच्या साथीने भारतीय संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. रोहितने आपलं शतकही पूर्ण केलं. मात्र ख्रिस वोक्सने त्याला माघारी धाडत भारताची जमलेली जोडी फोडली. रोहित माघारी परतल्यानंतर ऋषभ पंत, हार्दिक पांड्या ठराविक अंतराने माघारी परतले. तोपर्यंत भारतासमोरचं आव्हान कठीण होऊन बसलं होतं. अखेरच्या फळीत धोनी-केदार जाधवने फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचे प्रयत्न फोल ठरले. इंग्लंडकडून प्लंकेटने ३ तर वोक्सने २ बळी घेतले. दरम्यान, सलामीवीर जॉनी बेअरस्टोचं आक्रमक शतक आणि त्याला जेसन रॉय, बेन स्टोक्स आणि जो रुट यांनी दिलेली साथ या जोरावर यजमान इंग्लंडने ३३७ धावांपर्यंत मजल मारली आहे. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या इंग्लंडने भारतीय गोलंदाजीचा पुरता समाचार घेतला. मैदानाच्या चौफेक फटकेबाजी करत इंग्लिश फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांच्या चांगलेच नाकीनऊ आणले. बेअरस्टोने १११, बेन स्टोक्सने ७९ तर जेसन रॉयने ६६ धावांची खेळी केली. भारताला हा सामना जिंकण्यासाठी ३३८ धावांची गरज आहे. जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टो यांनी पहिल्या विकेटसाठी १६० धावांची भागीदारी केली. दोन्ही फलंदाजांनी भारताच्या फिरकीपटूंवर आक्रमण करत खोऱ्याने धावा ओढल्या. अखेरीस कुलदीप यादवने जेसन रॉयला माघारी धाडत इंग्लंडची जोडी फोडली. बदली खेळाडू रविंद्र जाडेजाने रॉयला सुरेख झेल टिपला. यानंतर बेअरस्टो आणि जो रुट जोडीने पुन्हा एकदा संघाचा डाव सावरला. बेअरस्टोने यादरम्यान आपलं शतकंही साजरं केलं. अखेरीस कर्णधार विराट कोहलीने चेंडू मोहम्मद शमीच्या हाती सोपवला. शमीने आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत बेअरस्टोला माघारी धाडलं. कर्णधार मॉर्गनही मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात शमीच्या गोलंदाजीवर माघारी परतला. ३०० पल्याड धावसंख्या गाठेल अशी खात्री असलेला इंग्लंडचा संघ अचानक संकटात सापडला. मात्र बेन स्टोक्सने जो रुटच्या साथीने अर्धशतकी भागीदारी रचत संघाचा डाव पुन्हा एकदा सावरला. पुन्हा एकदा मोहम्मद शमीनेच रुटचा अडथळा दूर करत भारताला आणखी एक यश मिळवून दिलं. मात्र दुसऱ्या बाजूने स्टोक्सने फटकेबाजी सुरु ठेवत इंग्लंडला ३०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. जोस बटलर आणि ख्रिस वोक्स यांना माघारी धाडत शमीने इंग्लंडला आणखी धक्के दिले. अखेरीस ५० षटकात इंग्लंडला ३३७ धावांपर्यंत रोखण्यात भारत यशस्वी ठरला. भारताकडून मोहम्मद शमीने निम्मा संघ गारद केला. कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी १-१ बळी घेऊन त्याला चांगली साथ दिली.