२०१९ साली इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडने न्यूझीलंडवर मात करत विजेतेपद पटकावलं. मात्र मर्यादीत षटकं आणि सुपर ओव्हरमध्येही सामना अनिर्णित राहिल्यामुळे इंग्लंडला अधिक चौकारांच्या निकषावर विजेता जाहीर करण्यात आलं. आयसीसीच्या या निर्णयावर नंतर टीकाही करण्यात आली होती. अखेरीस आयसीसीने तो वादग्रस्त निर्णय रद्द केलेला आहे. सोमवारी आयसीसीवे यासंदर्भात पत्रक जाहीर करत माहिती दिली आहे.

“आयसीसीच्या स्पर्धांमध्ये सामना अनिर्णित राहिल्यास सुपर ओव्हरमध्ये निकाल लावण्यात येण्याचा निर्णय कायम असणार आहे. मात्र साखळी फेरीत जर सुपर ओव्हरवर सामना अनिर्णित राहिला तर तो अधिकृतरित्या अनिर्णित घोषित केला जाईल. मात्र उपांत्य किंवा अंतिम फेरीत सुपर ओव्हरवर सामना अनिर्णित राहिला तर पुन्हा एकदा सुपर ओव्हर खेळवण्यात येईल.” आयसीसीने आपली बाजू स्पष्ट केली आहे.

२०१९ साली विश्वचषकात अंतिम सामन्यात झालेल्या प्रसंगानंतर अनेक आजी-माजी खेळाडूंनी आयसीसीच्या निर्णयावर टीका केली होती. त्यामुळे आयसीसीच्या या निर्णयावर आता काय प्रतिक्रीया येतायत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.