न्यूझीलंडविरुद्ध टी-२० मालिकेत भारतीय संघाने धडाकेबाज कामगिरी करत ५-० ने विजय मिळवला. न्यूझीलंडमध्ये टी-२० मालिका जिंकण्याची भारतीय संघाची ही पहिलीच वेळ ठरली. याचसोबत टी-२० क्रिकेटमध्ये ५ सामन्यांच्या मालिकेत व्हाईटवॉश देण्याचा पराक्रम करणारा भारत हा एकमेव संघ ठरला आहे. भारताकडून फलंदाजीत लोकेश राहुल तर गोलंदाजीत जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर यांनी चमक दाखवली.

लोकेश राहुलने या मालिकेत २०० पेक्षा जास्त धावा करत मालिकावीराचा किताबही पटकावला. रोहित शर्मानेही अखेरच्या सामन्यात ६० धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. या कामगिरीचा त्यांना आयसीसीच्या क्रमवारीत फायदा झालेला दिसत आहे. लोकेश राहुलने सहाव्या स्थानावरुन थेट दुसऱ्या स्थानावर उडी घेतली आहे. तर रोहित शर्माच्या स्थानातही सुधारणा झालेली असून तो दहाव्या स्थानावर आला आहे.

याव्यतिरीक्त भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नववं स्थान कायम राखलं आहे. टी-२० मालिकेत बाजी मारल्यानंतर भारतीय संघ आता ३ वन-डे आणि २ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.