WWT20 IND vs NZ : टी२० विश्वचषक स्पर्धेत भारताच्या महिला संघाने सलामीच्या लढतीत न्यूझीलंडच्या संघाचा ३४ धावांनी पराभव केला. कर्णधार हरमनप्रीत कौरने दणकेबाज खेळी करत १०३ धावा केल्या आणि भारताला १९४ धावांपर्यंत मजल मारून दिली. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या संघाला केवळ ९ बाद १६० धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यामुळे भारताने सामना ३४ धावांनी जिंकून स्पर्धेची सुरुवात विजयाने केली. हरमनप्रीतने महिला टी२० क्रिकेटमधील पहिले शतक झळकवण्याचा मान मिळवला. हरमनमप्रीतला सामनावीर घोषित करण्यात आले.

नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी स्वीकारली. सलामीवीर भाटिया ९ धावा करून तर स्मृती मानधना २ धावा करून बाद झाली. त्यानंतर हेमलतादेखील(१५) फार काळ खेळपट्टीवर तग धरू शकली नाही. मात्र रॉड्रिग्ज आणि हरमनप्रीत या दोघींनी फटकेबाजी करत भारताच्या डावाला आकार दिला. रॉड्रिग्जने ४५ चेंडूत ७ चौकरांसह ५९ धावा केल्या. तर हरमनप्रीतने वादळी खेळी करत ५१ चेंडूत ७ चौकार आणि ८ षटकार यांच्या मदतीने १०३ धावा केल्या. या दोघींनी ७६ चेंडूत १३४ धावांची भागीदारी केली आणि भारताला १९५ धावांपर्यंत पोहोचवले. न्यूझीलंडकडून ताहूहूने सर्वाधिक २ बळी टिपले.

या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडला अर्धशतकी सलामी मिळाली. पण त्यानंतर लगेचच पीटरसन (१४) बाद झाली आणि ठराविक अंतराने गडी बाद होत राहिले. सलामीवीर सुझी बेट्स हिने ५० चेंडूत ६७ धावा करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण तीदेखील बाद झाली. मार्टिनने काही काळ संघर्ष केला आणि ८ चौकरांसह ३९ धावा केल्या. या दोघींचे प्रयत्न तोकडे पडले. भारताकडून हेमलता आणि पूनम यादवने ३-३ बळी घेतले.